मागील चार वर्षाच्या काळात केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारने शेतकऱ्यांविषयी निर्णय घेण्यात अपयशी ठरले आहे. शेतकऱ्यांच्या मतावर हे सरकार आले असून त्यांना सत्ताधारी विसरले आहे, अशा शब्दात खासदार राजू शेट्टी यांनी भाजप सरकारवर सडकून टीका केली. तर या शेतकरी विरोधी सरकारला हेच शेतकरी घरी बसवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देखील पुण्यातील मोर्चा दरम्यान त्यांनी दिला.

यावेळी शेतकऱ्यांना उद्देशून केलेल्या भाषणामध्ये राजू शेट्टी म्हणाले की, राज्यातील ऊस उत्पादक शेतक्याची साखर कारखानदारांनी एफआरपी दिली नाही. ती त्वरित द्यावी तसेच साखर आयुक्तांनी कारखाना मालकाची मालमत्ता जप्त करावी. त्याचबरोबर दूध उत्पादक शेतकयाची अवस्था खूप वाईट असून या सरकारने लिटर मागे पाच रुपये थेट शेतक्याच्या खात्यावर जमा करावे, अशी मागणी अनेक वेळा सरकारशी पत्रव्यवहार केल्याचे शेट्टींनी सांगितले. तरी देखील या मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने हा मोर्चा काढावा लागला आहे. या मागण्या मान्य न झाल्यास आणखी तीव्र लढा उभारला जाईल अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.

राज्यातील ऊस आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आज पुण्यात अलका चौक ते साखर संकुल दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये राज्यातील विविध भागातील शेतकरी सहभागी झाले होते. या मोर्चामध्ये राज्यातील फडणवीस सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.