गावात येऊन खोटी आश्वासनं देणाऱ्या मंत्र्यांची कपडे फाडून तुडवून तुडवून मारा. तुम्हीच त्यांना मारलं पाहिजे असे वादग्रस्त वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि खासदार राजू शेट्टी यांनी केले आहे. अकोल्यातील निंबा गावात आयोजित एका सभेत राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांसमोर हे वादग्रस्त विधान केलं आहे. राजू शेट्टी सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत.

राजू शेट्टी यांनी वादग्रस्त वक्तव्य करत खळबळ उडवून दिली आहे. खोटी अश्वासने देणाऱ्या मंत्र्यांना आता मारलं पाहिजे. त्यासाठी मी कोल्हापूरमधून माणसं पाठवेन याची वाट पाहू नका. तुम्हालाच त्यांना मारायचं आहे. सरकार आपलं देणं लागतं. आम्ही बँकेचं देणं देऊ शकत नाही. मग आम्ही मंत्र्यांना ठोकलं तर बिघडलं कुठं?’ असा प्रश्नही उपस्थित केला.

शेट्टी यांच्यापाठोपाठ त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनीही वादग्रस्त वक्तव्य केलं. ‘यापुढे एकाही शेतकऱ्याने आत्महत्या करायची गरज नाही. गरज पडल्यास कापूस-सोयाबीनला भाव न देणाऱ्या मंत्र्यांना पेटवा, खासदार-आमदारांना ठोका, पण आत्महत्या करू नका’, असं सांगतानाच ‘शेट्टींनी सांगितलं तर एखाद्या मंत्र्याला भोसकायलाही कमी करणार नाही’, असं वक्तव्य तुपकर यांनी करून खळबळ उडवून दिली आहे.