भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे मत

शिवसेना स्वबळावर लढण्याची भाषा करीत असली तरी भाजपने त्यांच्यासोबत युती करण्यास तयारी दाखवली आहे. युतीसाठी आग्रह धरणे म्हणजे लाचारी नव्हेतर मित्रत्व होय, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

शिवसेना युतीसाठी नाही म्हणत असतानाही भाजप मात्र युतीची अपेक्षा बाळगून आहे, ही लाचारी नव्हे का असा थेट सवाल दानवे यांना केला  असता त्यांनी वरील उत्तर दिले. आगामी लोकसभा निवडणूक शिवसेनेसोबत मिळून लढण्याची भाजपची इच्छा आहे. २०१४ च्या निवडणुका वगळता सर्व निवडणुका आम्ही एकत्रित लढल्या. यामुळे मतांचे विभाजन टळणार आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) सर्व घटक पक्षांनी एकत्रित निवडणूक लढावी. ही भाजपची भूमिका असून घटक पक्षांनी एकत्र निवडणूक लढवल्यास पुढील पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच असतील, असेही ते म्हणाले. भाजपने २०१४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लाटेत जिंकलेल्या नाहीत. हे त्यानंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि पोटनिवडणुकीत स्पष्ट झाले आहे. भाजपने योग्य प्रकारे सरकार चालवतानाच पक्ष संघटनाही बळकट केली. राज्यात बुथ स्तरापासून बांधणी झाली आहे. एका कार्यकर्त्यांला १२ कुटुंबाची म्हणजे ६० मतदारांची जबाबदारी देण्यात आली आहे. शिवाय राज्यातील सर्व ४८ मतदारसंघात बैठका घेऊन आगामी निडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: ३ नोव्हेंबरला शिरुर लोकसभा मतदारसंघाच्या तयारीचा आढावा घेणार आहेत. शिवसेनेकडे जे मतदारसंघ तेथे देखील भाजप मजबूत केली जात आहे. युती झाल्यास त्याचा लाभ शिवसेनेला होईल. भाजपला लोकसभेत २०० जागा मिळतील, असा दावाही त्यांनी केला.

विकासाचाच मुद्दा

भाजपने राम मंदिरचा मुद्दा सोडलेला नाही, पण पुढील निवडणुका विकासाच्या मुद्यांवर लढवल्या जातील, असेही दानवे म्हणाले. छोटे राज्य असावे ही भाजपची भूमिका आहे. विदर्भ राज्याच्या निर्मितीचा प्रश्न सर्वाच्या सहमतीने सोडण्यात येईल. पहिल्या परीक्षेत सर्व आमदार उत्तीर्ण झाले आहेत. मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे, परंतु त्याची तारीख निश्चित झालेली नाही, असेही ते म्हणाले.