ग्रामीण भागातील प्रशासकीय यंत्रणेला सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला असून कृषी व अन्य विभागांमधील ३६ हजार रिक्त पदे भरण्यास बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली.

गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील प्रशासनातील विविध विभागांमधील ७२ हजार रिक्त जागा दोन टप्प्यात भरण्यात येतील, असे सांगितले होते. यातील पहिल्या टप्प्यात या वर्षी ३६ हजार तर पुढील वर्षी दुसऱ्या टप्प्यात ३६ हजार पदे भरली जातील. यानुसार या वर्षी राज्यातील कृषी आणि ग्रामविकासाशी संबंधित विविध विभागांमधील रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. रिक्त पदे भरल्याने ग्रामीण भागातील प्रशासकीय यंत्रणेचे बळकटीकरण होणार असून त्यासोबतच युवकांना रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध होणार आहेत.

सरकारच्यावतीने शेतकरी तसेच ग्रामीण भागासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. मात्र, रिक्त पदांमुळे अंमलबजावणीत अडथळे येत होते, असे सांगितले जाते. म्हणूनच सरकारने ही पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे.

या विभागांमध्ये होणार भरती

पहिल्या टप्प्यात ग्रामविकास विभागातील ११ हजार, सार्वजनिक आरोग्य विभागातील १० हजार ५६८, गृह विभागातील ७ हजार १११, कृषी विभागातील २ हजार ५७२, पशुसंवर्धन विभागातील १ हजार ४७, सार्वजनिक बांधकाम विभागातील ८३७ पदे, जलसंपदा विभागातील ८२७, जलसंधारण विभागातील ४२३ पदे, मत्स्यव्यवसाय विकास विभागातील ९०, नगरविकास विभागातील १ हजार ६६४ पदे भरली जातील.