“कुणाच्या दबावाचा प्रश्नच नाही, संजय राठोडबाबत नियमानुसार चौकशी होणार, सत्य बाहेर येणार. चौकशीत जे काही समोर येईल, त्यानंतर राज्यशासन निर्णय घेणार आहे.”  असं आज(सोमवार) राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकारपरिषदेत सांगितलं.

राज्यात सध्या बीड जिल्ह्य़ातील परळी वैजनाथ येथील पूजा चव्हाणच्या  कथित आत्महत्या प्रकरणावरुन राजकारण तापलं आहे.  विरोधक आणि राज्य सरकारमधील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.  या प्रकरणात भाजपाने थेट शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड यांचं नाव घेतले आहे. तर, आठ दिवसांपासून संजय राठोड गायब असल्याने, भाजपा नेते अधिकच आक्रमक झाले आहेत.

“ठाकरे सरकार आल्यापासून झुंडशाही बळावली आहे”

या पार्श्वभमीवर आज पत्रकारपरिषदेत बोलताना अनिल देशमुख म्हणाले, “या संदर्भात अगोदरच मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की, नियमानुसारच चौकशी होणार आहे. विरोधीपक्ष ज्या पद्धतीचे आरोप करत आहेत, त्या आरोपात काही तथ्य नाही. पोलीस व्यवस्थित तपास करत आहेत. संजय राठोड कुठं आहेत? हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण मी गृहखात्याचा मंत्री म्हणून सांगतो की, नियमानुसार चौकशी व कारवाई होणार आहे. जे काही सत्य असेल ते महाराष्ट्रा समोर येईल. एकदा संपूर्ण चौकशीचा अहवाल समोर आल्यानंतर, वस्तूस्थितीसमोर आल्यानंतर राज्यशासन निर्णय घेईल.”