|| निखिल मेस्त्री पालघर परिसरात सर्पदंश घटनांमध्ये वाढ :- तापमानवाढीमुळे सरपटणारे प्राणी गारवा शोधण्यासाठी नागरी वस्ती, परिसरात येऊ लागले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून दंश होण्याच्या घटना घडत असून काही महिन्यांपासून विषारी सर्पदंश झालेल्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांमधून दिसून आले आहे. परिसरात भीतीचे वातावरण असून प्रशासकीय यंत्रणेने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तापमानात होणारी वाढ सरपटणाऱ्या प्राण्यांना सहन होत नसल्याने ते गारव्यासाठी जागा शोधत असतात. या शोधात त्यांचा शिरकाव नागरीवस्तीत होत आहे. रात्रीच्या वेळी चुकून पाय पडल्याने या प्राण्यांकडून दंश होण्याच्या घटना घडत आहेत. दर दिवशी चार ते पाच जणांना हा दंश होत असून अशा रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या महिन्याभरात १२० जणांना सर्पदंश झाला असून वर्षांकाठी सुमारे पाचशेहून अधिक सर्प, विंचूदंश होत असल्याची माहिती देण्यात येते. यापूर्वी सर्पदंश झालेल्या रुग्णांची संख्या इतकी नव्हती असे रुग्णालय प्रशासनाने म्हटले आहे. यातील बहुतांश सर्पदंश रुग्ण हे ग्रामीणबहुल भागातील नागरिक असल्याचे निदर्शनास आले आहे. सर्पदंश झालेल्या रुग्णांची संख्या वाढली असली तरी पालघर ग्रामीण रुग्णालयात सर्पदंशावर पुरेसा औषध साठा उपलब्ध असल्याचे रुग्णालय प्रशासनाने म्हटले आहे. मात्र ही वाढ चिंतेची बाब असून ग्रामीण भागातील नागरिकांनी यासाठी खबरदारी घेणे अपेक्षित असल्याचे म्हटले आहे. नागरिकांनी संध्याकाळनंतर शक्यतो अनवाणी अडगळीच्या ठिकाणी फिरू नये. रात्री काळोखातून बाहेर पडताना, शेतात, बांधावर, गवतातून चालताना टॉर्चचा वापर करवा अशी खबरदारी घ्यावी तसेच यानंतरही सर्पदंश झाल्यास प्रथमत: त्या रुग्णास नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा रुगणालयात तसेच नजीक असल्यास पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्याचे आवाहन वैद्यकीय अधीक्षक दिनकर गावित यांनी यानिमित्ताने केले आहे. तापमान वाढीमुळे सर्प ग्रामीण भागात तापमानात सातत्याने वाढ होत गेल्यास त्याचा फटका सरपटणाऱ्या प्राण्यांना बसत असतो. तापमान सहन न झाल्यामुळे गारवा शोधण्यासाठी ते ग्रामीण भागात धाव घेतात. ग्रामीण भाग, पसिरात गवत, शेताचे बांध, अडगळीच्या ठिकाणी, घराच्या कौलारू छतावर, घराची पडकई पाणवठे, पाणथळ जागा, शेततळी, ओलावा असलेल्या जमिनी अशा थंड जागेचा ते आसरा घेतात. या ठिकाणी नागरिकांचा वावर असल्याने एखादया सर्प वा विंचू अशा सरपटणाऱ्या प्राण्यांवर चुकून पाय पडल्यास स्वसंरक्षणार्थ हे प्राणी त्या व्यक्तीस दंश करीत असतात. अशा घटना पालघर जिल्ह्य़ातील ग्रामीण भागात घडत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.