लोकसत्ता प्रतिनिधी अकोला : राज्यात नुकताच कृषी संजीवनी सप्ताह पाळण्यात आला. त्याप्रमाणे शेतकरी तक्रार निवारण पंधरवाडा पाळून विभाग, जिल्हा, तालुकास्तरावर शेतकऱ्यांच्या तक्रारी सोडवण्याचे आदेश द्याावे, अशी मागणी कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे भारत कृषक समाजाचे महाराष्ट्राचे चेअरमन डॉ. प्रकाश मानकर यांनी निवेदनाद्वारे केली. शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी आहेत. कर्जमाफी, पीक विम्याचे पैसे, दुष्काळ निधी, तूर, हरभऱ्याचे पैसे, पीक कर्ज, बँका, वीज, बोगस बियाणे, कृषी सेवा केंद्र आदींसंदर्भात असंख्य समस्यांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. शेतकरी मानसिकरित्या खचून जात आहे. निगरगट्ट अधिकारी कर्मचारी टोलवा-टोलवी करून शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यात टाळाटाळ करतात. त्यामुळे शेतकºयांना दिलासा देण्यासाठी तक्रार निवारण पंधरवाडा पाळून सर्व संबंधित विभागांनाच कडक सूचना द्याावी, शेतकऱ्यांच्या तक्रारी सोडवाव्यात तसेच यात दोषी आढळलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी प्रकाश मानकर यांनी केली आहे.