लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर साता-यात आज राजकीय घटनांनी कमालीचा वेग घेतला. खा. उदयनराजे भोसले यांची प्रचाराची फेरी, महायुतीचे आरपीआयचे संभाजी संकपाळ यांना उमेदवारी जाहीर करणे किंवा शिवसेनेच्या पुरुषोत्तम जाधव यांनी शिवसेनेला रामराम ठोकण्याच्या विषयाने जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले आहे.
सकाळी खा. उदयनराजे भोसले यांनी प्रचारफेरीद्वारा आपल्या मतदारांना स्वतच्या उमेदवारीबद्दल उधोरेखित केले. पोवईनाका येथील शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सातारा-कराड रॅलीस प्रारंभ केला. यावेळी पालकमंत्री शशिकांत िशदे तसेच जिल्हाध्यक्ष डॉ. दिलीप येळगावकर तसेच जि. प. अध्यक्ष अरुणादेवी पिसाळ आदी मान्यवर उपस्थित होते. मात्र खा. भोसले यांचे चुलत बंधू आणि राष्ट्रवादीचे आमदार शिवेंदसिंहराजे भोसले पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे या प्रचार फेरीस हजर नव्हते. सातारा ते कराड अशी प्रचार फेरी काढण्यात आली. स्व. यशवंतराव चव्हाण यांची आज जयंती असल्याने खा. भोसले यांनी स्व. चव्हाण यांना कराड येथे प्रीतिसंगमावरील स्मृतिस्थळास भेट देऊन आदरांजली वाहिली. आ. बाळासाहेब पाटील, आ. विक्रमसिंह पाटणकर, आ. मकरंद पाटील तसेच जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते. जागोजागी त्यांना कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त स्वागत करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत सर्वाच्या सहकार्याने विक्रमी मताने आम्ही खा. भोसले यांना निवडून आणू, असा विश्वास ना. शशिकांत िशदे यांनी व्यक्त केला. दरम्यान, दुपारी शिवसेनेचे संपर्कप्रमुख बाबुराव माने यांनी पत्रकार परिषद घेऊन महाआघाडीतल्या सर्व कुरबुरी, छोटेमोठे मतभेद संपवून राजकीय समीकरणे जुळवून येण्यासाठी महायुतीच्या मित्रपक्षाचे, आरपीआयचे उमेदवार संभाजी संकपाळ यांना सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याचे नक्की केले आहे. त्यामुळे कोणतेही मतभेद नाहीत हे स्पष्ट केले. सातारा जिल्ह्यातील रहिवाशी खा. गजानन बाबर आणि खासदारकीच्या रिंगणातले शिवसेनेचे उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांनी शिवसेनेचा राजीनामा दिला आहे. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना माने म्हणाले, अस्वलाच्या अंगावरचे एक, दोन केस गेले तर फरक पडत नाही आणि निवडणुकीत पक्षांतरे होतात, त्यात फारसे मोठे काही नाही, असे उत्तर देऊन जिल्ह्याला कोणताही फटका बसणार नाही, असे स्पष्ट केले. सध्या सातारा येथे जिल्हाप्रमुख पद नाही. सातारा येथे दोन जिल्हा प्रमुख असतील असेही माने म्हणाले.
दरम्यान, गत लोकसभेत शिवसेनेतून निवडणूक लढवणारे पुरुषोत्तम जाधव हे आरपीआयने त्यांना उमेदवारी न दिल्याने नाराज झाले आहेत. ते अपक्ष निवडणूक लढवणार त्यासाठी शिवसेना सोडणार, अशी चर्चा सुरू होती. त्यांच्याशी संपर्क साधता इतर कोणत्याही पक्षातून उमेदवारी घेण्यापेक्षा अपक्ष निवडणूक लढवलेली काय वाईट, अशी त्यांची प्रतिक्रिया होती. मनसे त्यांना उमेदवारी देण्यास तयार असल्याचीही चर्चा होती.