राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या राज्यभर दौरे करत आहेत. मात्र त्यांच्या या दौऱ्यावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. राज्यात लॉकडाउन असून कठोर निर्बंध लावण्यात आलेले असताना देवेंद्र फडणवीस दौऱ्यावर असल्याने प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. फडणवीसांच्या दौऱ्यात करोना संबंधीच्या नियमांचं उल्लघन होत असल्याची तक्रार कोपरगाव येथील आरटीआय कार्यकर्ते संजय काळे यांनी केली आहे. तसंच फडणवीसांनी ई पास काढला आहे का? अशी विचारणा त्यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी कोपरगावचा दौरा केला होता. कोपरगाव येथील आत्मा मालिक ज्ञानपीठ आणि माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या पुढाकारातून स्थापन झालेल्या संजीवनी कोविड केअर सेंटरचे उदघाटन करण्यासाठी ते पोहोचले होते. कोकमठाण,ता.कोपरगाव आत्मा मालिक ज्ञानपीठ आणि माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या पुढाकारातून स्थापन झालेल्या संजीवनी कोविड केअर सेंटरचे कोकमठाण,ता. कोपरगाव येथे उदघाटन केले.ऑक्सिजन बेड्स आणि आयसीयू इत्यादी सुविधांमुळे रूग्णांना याचा मोठा लाभ घेता येणार आहे.#FightAgainstCorona pic.twitter.com/nIAlni4IUP — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 17, 2021 या दौऱ्याच्या अनुषंगाने संजय काळे यांनी माहितीच्या अधिकारात राज्याच्या मुख्य सचिवांकडे अर्ज केला आहे. त्यामध्ये फडणवीस यांनी जिल्ह्याची सीमा ओलांडण्यासाठी नियमानुसार ई-पाससाठी अर्ज केला आहे का ? याची माहिती मागितली आहे. दहा माणसांपेक्षा जास्त गर्दी करायची नसतानाही गर्दी करण्यासाठी परवानगी होती का? असंही त्यांनी अर्जात विचारलं आहे. यावेळी त्यांनी पोलीस प्रशासन व तालुका, जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेल्या कारवाईबद्दलही विचारलं आहे. दरम्यान निलेश राणे यांनी यावरुन मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. "देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा दौरा करताना ई-पास काढलाय का असं माहितीच्या अधिकारात विचारण्यात आलं. तसंच उद्धव ठाकरे कधी ई-पास काढणार आहेत किंवा काढणार की नाही हे पण माहितीच्या अधिकारात विचारावं. उद्धव ठाकरे घराच्या बाहेर पडले, ही बातमी बघायला महाराष्ट्राची जनता थांबली आहे," असा टोला त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून लगावला आहे. देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्राचा दौरा करताना ई-पास काढलाय का असं माहितीच्या अधिकारात विचारण्यात आलं. तसंच उद्धव ठाकरे कधी ई-पास काढणार आहेत किंवा काढणार की नाही हे पण माहितीच्या अधिकारात विचारावं. उद्धव ठाकरे घराच्या बाहेर पडले, ही बातमी बघायला महाराष्ट्राची जनता थांबली आहे. — Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 20, 2021 देवेंद्र फडणवीस सध्याच्या घडीला कोकणात असून तौते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करत आहेत.