मराठा आरक्षणावरून भाजपाचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आक्रमक भूमिका घेत, महाविकासआघाडी सरकारला ६ जूनपर्यंतची मूदत दिली आहे. तसेच, निर्णय न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्वाणीचा इशाराही दिलेला आहे. या पार्शअवभूमीवर त्यांनी राज्यभर दौरा सुरू केला आहे. दरम्यान आज त्यांनी एक खळबळजनक ट्विट करत, राज्य सरकार माझ्यावर पाळत ठेवत आहे, असा आरोप केला होता. यावरून नव्या चर्चांना उधाण आलेलं असतानाच, आता संभाजीराजेंनी स्वतः याबाबत खुलासा केला आहे.

“आताच गृह मंत्र्यांचा फोन आला होता. त्यांनी सांगितले, खालच्या कर्मचाऱ्यांची बैठकीच्या ठिकाणी आत जिल्हाधिकारी चेंबरमध्ये येण्याची चूक झाली. परंतु त्यांचा उद्देश हेरगिरीचा नव्हता. माझ्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी तसे केले असावे. मी सुद्धा त्यांच्या या वक्तव्यावर समाधानी असून हा विषय संपला आहे.” असं संभीजीराजे यांनी ट्विटद्वारे सांगितलं आहे.

तर, “सरकार माझ्यावर पाळत ठेवत आहे. माझी हेरगिरी करण्याचा नेमका उद्देश माहीत नाही. पण मला हेच लक्षात येत नाहीये की माझ्यासारख्या सरळ आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या एका कार्यकर्त्यावर हेरगिरी करून काय साध्य होणार आहे?” असं या अगोदर संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विटद्वारे म्हटलं होतं.

मराठा आरक्षण : “सरकार माझ्यावर पाळत ठेवतंय”; संभाजीराजे यांचा खळबळजनक गौप्यस्फोट!

कोणते सरकार ?
दरम्यान, त्यांच्या या विधानानंतर उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात होत्या. अनेकांनी त्यांना पाठिंबा देत आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असे स्पष्ट केले. तर काहींनी ‘केंद्र की राज्य शासन पाळत ठेवत आहे हे स्पष्ट करा अन्यथा ते कुजबुज मोहिमेला कारणीभूत ठरेल,’ असेही म्हंटले आहे.