आठ दिवसांमधील राज्यातील करोना रुग्णसंख्येची वाढ लक्षात घेऊन लॉकडाऊनसंदर्भातील निर्णय घेण्यात येईल असा इशारा रविवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. मात्र राज्यातील ठाकरे सरकार हे जनतेला लॉकडाऊनची भीती दाखवून अधिवेशनापासून पळ काढण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी बरोबर अधिवेशनाच्या काळामध्येच करोना कसा वाढला असा प्रश्न उपस्थित केला आहे. एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांना घरात लपून बसायचं आहे. अधिवेशनात लोकांच्या प्रश्नांची उत्तर द्यायची नाहीयत म्हणून सरकार आता लॉकडाउनची धमकी देऊ लागलं आहे का?, असा प्रश्न विचारला आहे. नक्की वाचा >> अधिवेशन टाळण्यासाठी ठाकरे सरकार करोनाचे आकडे वाढवून सांगितले जात आहेत का?; मनसेने उपस्थित केली शंका "मुख्यमंत्र्यांना घरात लपून बसायचं आहे. त्यांना अधिवेशन काळामध्ये लोकांच्या प्रश्नांना उत्तर द्यायची नाहीयत म्हणून तुम्ही लोकांना लॉकडाऊनची धमकी देणार का?, इतके दिवस रुग्ण वाढले नाही. आताच बरे रुग्ण वाढले. आणि रुग्णवाढीचं काय कारण सांगितलं जात आहे तर ट्रेन पुन्हा चालू झाल्या. ट्रेनआधी पूर्णपणे बंद होत्या का? कशामुळे वाढले रुग्ण?, ही सरकारची नाटकं सुरु आहेत. ये पब्लिक हैं सब जानती है," असं देशपांडे यांनी टीव्ही नाईन मराठीशी बोलताना म्हटलं आहे. "सावधान सध्या करोना चा नवीन स्ट्रेन आला आहे त्याच नाव विधिमंडळ अधिवेशन करोना अस आहे जो शरीरावर कमी पण स्वातंत्र्यावर अधिक परिणाम करतो," असं खोचक ट्विटही देशपांडे यांनी केलं आहे. सावधान सध्या करोना चा नवीन स्ट्रेन आला आहे त्याच नाव विधिमंडळ अधिवेशन करोना अस आहे जो शरीरावर कमी पण स्वातंत्र्यावर अधिक परिणाम करतो.टीप-ह्या नंतर अनेक मा वि आ समर्थक मला ट्रोल करतील पण जे सत्य आहे ते बोलणारच — Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) February 22, 2021 "आज तुम्ही म्हणता लॉकडाऊन आम्ही करु अशी धमकी तुम्ही लोकांना देताय. कुठली अशी रुग्ण संख्या वाढली आहे आणि कशामुळे वाढली आहे हे सरकार सांगत नाही. तुम्ही मध्यंतरी चाचण्यांची संख्या कमी केली तेव्हा रुग्ण कमी झाले. चाचण्या वाढल्या आकडे वाढले. वातावरणनिर्मिती करुन तुम्ही लोकांना घाबरवता. महापौर फिरत असतात. त्या एक दिवसाच्या नर्सबाई सांगतात की आम्ही मार्शलला टार्गेट दिलं आहे २५ हजारांचं. तुम्ही टार्गेट दिलं आहे?, ते ही मार्शला? हे महापौरांचे धंदे आहेत का?, तुम्हाला अधिवेशन नाही घ्यायचं आहे नका घेऊ. तुम्हाला स्पीकरची निवड नाही करायची नका करु पण या सगळ्यासंदर्भात तुम्ही लोकांना का त्रास देताय?," अशा शब्दांमध्ये देशपांडे यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. आता कुठे लोकं उभारी घेतायत तर तुम्ही त्यांना लॉकडाऊनची धमकी देताय का असा प्रश्न देशपांडे यांनी विचारला आहे. "बरोबर राष्ट्रवादीच्याच लोकांना होतो का करोना?, शेतकऱ्यांचं एवढं मोठं आंदोलन सुरु आहे तिकडे नाही झाला करोनाचा फैलाव. फक्त महाराष्ट्रात येतो का करोना? हे सगळं प्लॅनिंग करुन सुरु आहे. अधिवेशन घ्यायचं नाही. अमरावतीमध्ये कुठेतरी चाचण्या वाढवायच्या आणि संख्या वाढलेली दाखवायची. मग लोकंच कशी जबाबदार आहे दाखवायला मार्शलला कारवाई करायला लावलीय. पाणी प्यायला लोकं मास्क खाली घेतात तरी करावाई करतात. म्हणजे लोकं बेजबाबदार वागतायत हे सिद्ध करण्यासाठी मार्शलला टार्गेट द्यायचं. लोकांना घाबरवण्यासाठी हे धंदे सुरु आहेत का? एवढ्या महिने बसमध्ये चेंगराचेंगरीत लोकं जातात तेव्हा नाही झाला करोनाचा फैलाव. पेट्रोल दरवाढीविरोधात आंदोलन केलं तेव्हा नाही झाला फैलाव. आताच कसा अधिवेशन काळात झाला करोनाचा फैलाव?," असा प्रश्न देशपांडेनी विचारला आहे.