‘कंगनाला हरामखोर मुलगी म्हटल्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माफी मागावी’, असं वक्तव्य अभिनेत्री दिया मिर्झाने केलं आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री कंगना रणौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. तिच्या या वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत प्रचंड संतापले असून ते सोशल मीडियाच्या माध्यमातून कंगनावर निशाणा साधत असल्याचं पाहायला मिळत आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी कंगना सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने व्यक्त होत आहे. यामध्येच तिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली. तिच्या या वक्तव्यानंतर नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून अनेकांनी तिच्यावर टीकास्त्र डागलं आहे. यात सेलिब्रिटींपासून ते राजकीय व्यक्तींपर्यंत अनेकांनी कंगनाला खडेबोल सुनावले आहेत. त्यातच अलिकडे झालेल्या एका मुलाखतीत संजय राऊत यांनी कंगनाला ‘हरामखोर मुलगी’ असं म्हटलं होतं. त्यांचं हे वक्तव्य ऐकल्यानंतर ‘संजय राऊत यांनी माफी मागावी’, असं दिया म्हणाली आहे. तिने ट्विट करत तिचं मत व्यक्त केलं आहे.

“संजय राऊत यांनी हरामखोर हा अत्यंत चुकीचा शब्दप्रयोग केला आहे. सर, कंगनाने जे वक्तव्य केलं, त्यावर नाराजी व्यक्त करण्याचा किंवा त्यावर मत मांडण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. मात्र अशी भाषा वापरल्याप्रकरणी तुम्ही माफी मागावी”, असं ट्विट दियाने केलं आहे.

दरम्यान, कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यामुळे सर्वच स्तरावर एकच संतापाची लाट उसळली आहे. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्यावर टीकास्त्र डागलं आहे. मात्र, या प्रसंगातही कंगना खंबीरपणे सगळ्याला सामोरं जात असून ‘येत्या ९ तारखेला मी मुंबईत येत आहे, हिंमत असेल तर रोखून दाखवा’, असं वक्तव्य कंगनाने केलं आहे. त्यामुळे तिच्या या वक्तव्यानंतर पुन्हा हा वाद पेटला आहे.