मराठा समाजाच्या उत्थानासाठी तयार करण्यात आलेल्या सारथी संस्थेतील अनियमिततेमुळे राज्यात संतापाची लाट उसळली होती. यापार्श्वभूमीवर या संस्थेचा कारभार पाहणारे प्रधान सचिव जे. पी. गुप्ता यांच्याकडून कारभार काढून घेण्यात आला असून मदत व पुनर्वसन सचिव किशोर राजे निंबाळकर यांच्याकडे सोपवण्यात आला. राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. गुप्ता यांच्यावर सारथीच्या स्वायत्ततेवर गदा आणल्याचा आरोप आहे. सरकारला अंधारात ठेऊन ते परस्पर निर्णय घेत असल्याचा ठपकाही त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. याविरोधात मराठा समाजात संतापाची लाट उसळल्याने अनेकदा आंदोलनेही झाली आहेत. अनुसुचित जाती-जमातीच्या उत्थानासाठी कार्यरत असलेल्या 'बार्टी' या संस्थेच्या धर्तीवर मराठा-कुणबी समाजाच्या उत्थानासाठी 'सारथी' संस्थेची निर्मिती शासनाने केली आहे. या संस्थेला राज्य सरकारकडून अनुदान देण्यात येते. मात्र, शासनाने या संस्थेला कंपनी कायद्यांतर्गत स्वयत्तता बहाल केली होती. मात्र, प्रधान सचिवांनी या संस्थेतील व्यवहारांवर आक्षेप नोंदवले. तसेच संस्थेची स्वायत्तता संपुष्टात आणून तिला मंत्रालयाच्या अधिकारक्षेत्रात आणण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, जर सारथी संस्थेतील व्यवहारांमध्ये अनियमितता झाली असेल तर त्याची चौकशी केली जाईल असे सारथीचे नवे प्रमुख किशोर राजे निंबाळकर म्हटले आहे. तसेच याबाबतचा संपूर्ण अहवाल राज्य शासनाकडे सादर केला जाणार आहे.