'वॉटर कप' स्पर्धेच्या माध्यमातून मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात श्रमदान करण्यात येत आहे. बीड जिल्ह्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी येथील लोक मेहनत घेताना दिसते. दुष्काळावर मात करण्यासाठी वॉटरकप स्पर्धेच्या माध्यमातून धारूर तालुक्यातील कोळपिंपरीतील गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून ८० हजार रुपये जमा केले आहेत. विशेष म्हणजे ही वर्गणी केवळ कोळपिंपरी गावातून जमा केली आहे. बीड जिल्यातील अनेक गावकऱ्यांना उन्हाळ्याच्या दिवसांत १ ते २ किलोमीटर पिण्याचे पाणी आणण्यासाठी जावं लागत. धारूर तालुक्यातील कोळपिंपरी गावालाही या समस्येचा सामना करावा लागतो. २ हजार लोकसंख्या असलेल्या या गावाला गेल्या बऱ्याच वर्षापासून पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. गावातील लहान मुले, तरुण- तरुणी, आणि वयोवृद्धमंडळींना १ ते २ किलोमीटर वरून पिण्याचे पाणी आणावे लागते. पाणीटंचाईच्या या गंभीर प्रश्नावर आमिर खानने सुरु केलेली वॉटर कप स्पर्धा ही कोळपिंपरी गावासाठी वरदान ठरत आहे. येथील तरुण पिढी, नागरिक, महिला, बच्चेकंपनी हे सर्व जिद्दीने काम करत आहेत. सकाळी सहा वाजल्यापासून ते सायंकाळी सातवाजेपर्यंत गावातील ही सर्व मंडळी श्रमदान करत आहेत. 'पाणी फाउंडेशन'कडून गावासाठी एक जेसीपी देण्यात आला आहे. जेसीपी मिळाल्यानंतर त्यामध्ये डिझेल कसे उपलब्ध करायचे हा प्रश्न गावकऱ्यांसमोर निर्माण झाला होता. यासाठी शाळेतील विद्यार्थी, पुण्यासारख्या ठिकाणी काम करणारे युवक तसेच गावातील अन्यमंडळींकडून देणगीच्या स्वरुपात ८० हजार रुपये जमा करण्यात आले. त्यामुळे गावात सध्याच्या घडीला जेसीपीच्या साहाय्याने जोरदार काम सुरु आहे.