भारतीय जनता पार्टीचे सावरकर प्रेम म्हणजे ढोंगीपणा आहे. साडेपाच वर्षे मोदींचे सरकार केंद्रात आहे. सावरकरांना भारतरत्न द्यावे, अशी मागणी आम्ही केंद्राकडे करत आहोत मग आतापर्यंत का दिला नाही, असा सवाल शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांबद्द्ल केलेल्या विधानावरून वाद सुरू आहे. त्यावर राऊत यांनी सावरकरांबद्द्ल महाराष्ट्रातील कॉंग्रेसच्या लोकांनी राहुल गांधी यांना माहिती देणे आवश्यक असल्याचे नमूद केले. मुंबईतील  सावरकरांचे स्मारक केवळ बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारला कुठलाही धोका नाही. राज्यातील आघाडीचे सरकार  कार्यकाल पूर्ण करेल. एखादी व्यक्ती एखाद्या व्यक्तीवर काय बोलते यावर या सरकारचं भवितव्य अवलंबून नाही, राज्यातील सरकार आणि सावरकर हे स्वतंत्र विषय आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले.

केंद्र सरकारच्या धोरणांमुळे राज्याला आíथक चणचण भासते आहे. केंद्र सरकारकडून जीएसटीच्या परताव्यापोटी १५ हजार ५०० कोटी रुपये महाराष्ट्राला येणं आहे. ते मिळालेच पाहिजेत, ते मिळाले नाहीत तर राज्यातील शेतकऱ्यांच्या तोंडचा घास तुम्ही हिरावून घेताय, अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडली.