गेल्या अनेक वर्षांपासून स्वत: वृक्षारोपणाची जबाबदारी पेलणारे अभिनेते सयाजी शिंदे यांनी काही दिवसापूर्वी महाराष्ट्रातील वृक्ष लागवडीवरुन संताप व्यक्त केला होता. ‘महाराष्ट्रामध्ये होत असलेली वृक्ष लागवड हे केवळ एक नाटक आहे. तसंच ३३ कोटींची वृक्ष लागवड हे थोतांड आहे’, असं सयाजी शिंदे म्हणाले होते. मात्र आता या विधानाबाबत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. 'रागाच्या भरात प्रतिक्रिया दिल्यामुळे ग्रामसेवकांबद्दल चुकीचा संदेश गेला आहे. माझ्या या वक्तव्यामुळे ज्यांनी मनं दुखावली गेली आहेत, त्यांची मी दहावेळा माफी मागतो', असं सयाजी शिंदे म्हणाले. सयाजी शिंदे यांनी ग्रामसेवक राज्य सरचिटणीस प्रशांत जामोदे यांना एक मेसेज पाठवत दिलगिरी व्यक्त केली आहे. "ग्रामसेवक मित्रांनो एका ठिकाणची परिस्थिती पाहून रागाच्या भरात मी एका वाहिनीवर प्रतिक्रिया दिली होती. मात्र कोणालाही दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. मी दिलेल्या प्रतिक्रियेतून ग्रामसेवकांबद्दल चुकीचा संदेश गेला. आपण सारेच जण उत्तम काम करत आहात. यापुढे कधीत शासकीय कर्मचारी आणि व व्यवस्थेवर बोलणार नाही. तुम्ही एकदा म्हणालात, मी दहा वेळा दिलगिरी व्यक्त करतो. तुमचे काम अप्रतिम आहे. माझ्या बोलण्यात चूक झाली. तुमच्या भावी कार्याला शुभेच्छा !' असा मेसेज सयाजी शिंदे यांनी पाठवून दिलगिरी व्यक्त केली. वाचा : वृक्ष लागवड हा महाराष्ट्र सरकारचा दिखावा -सयाजी शिंदे दरम्यान, काही दिवसापूर्वी "राज्य सरकारने वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेतला असून यामध्ये ३३ कोटी वृक्ष लावण्याचं लक्ष्य सरकारचं आहे. तसा निर्धारदेखील राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. मात्र राज्य सरकारची ही वृक्ष लागवड योजना केवळ दाखविण्यापुरती आहे”, असं ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणत सयाजी शिंदे यांनी सरकारवर ताशेरे ओढले होते.