नागपूरमध्ये स्टेट बँकेच्या कर्मचाऱ्याचा काम करत असताना मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आर. व्ही. राजेश (वय ५०) असे मृत्यू झालेल्या कर्मचाऱयाचे नाव आहे. काम करत असताना दुपारी एकच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. नोटबंदीच्या निर्णयानंतर देशभरात आतापर्यंत ३५ हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. राजेश हे बँकेत काम करत असताना दुपारी एकच्या सुमारास छातीत कळ आली. त्यानंतर ते जागीच कोसळले. बँकेतील इतर सहकारी कर्मचाऱ्यांनी त्यांना शेजारी असलेल्या व्होकहार्ट रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर बँक बंद केली आहे. या प्रकरणी अंबाझरी पोलिस पुढील तपास करत आहेत. नोटबंदीच्या निर्णयानंतर बँकेबाहेर गर्दी वाढली असून सर्वसामान्यांची गैरसोय टाळण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचा दावा केंद्र सरकारकडून केला जात आहे. पण केंद्र सरकारचा हा निर्णय आता नागरिकांबरोबर बँक कर्मचाऱ्यांच्या जीवावर बेतू लागल्याचे दिसत आहे. बुधवारी (दि. १६) कामाच्या ताणामुळे पुण्यातील स्टेट बँकेच्या कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला होता. तर भाईंदर येथे बँकेच्या रांगेत उभ्या असलेल्या एका ज्येष्ठ नागरिकालाही आपला जीव गमवावा लागला आहे. पैशांअभावी उपचार न मिळणे, पैसे नसल्याने निराश होऊन आत्महत्या केल्याच्या घटनांचा यामध्ये समावेश आहे. देशात निर्माण झालेल्या ‘चलन’कल्लोळात दिवसेंदिवस भरच पडत चालली आहे. तीन दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथील स्टेट बँकेच्या कर्मचाऱ्याला अस्वस्थ वाटत असल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. नोटबंदीमुळे नागरिकांबरोबर आता बँक कर्मचाऱ्यांमध्येही अस्वस्थता पसरली आहे. पुण्यातील एसबीआयच्या राजगुरूनगर शाखेतील कर्मचाऱ्याला सुमारे १२.३० च्या सुमारास हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांना लगेचच उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण त्यांचा मृत्यू झाला. नोटबंदीमुळे बँक कर्मचाऱ्यांवरही कामाचा ताण वाढला आहे. आठ तासाहून अधिक वेळ काम करावे लागत आहे. अनेक ठिकाणी कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये वादाचे प्रसंग घडत आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांवरही ताण वाढला आहे. तर दुसरी घटना मुंबईतील भाईंदर येथे घडली होती. पैसे काढण्यासाठी बँकेच्या रांगेत उभे असलेले दीपक शहा यांना अचानक छातीत कळ आली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. दीपक शहा हे सकाळी ७ पासून बँकेच्या रांगेत उभे होते. सकाळी ११च्या सुमारास त्यांचा नंबर येताच त्यांना छातीत कळ आली व त्यांचा मृत्यू झाला. नोटबंदीनंतर निर्माण झालेली परिस्थिती लवकरच सुरळित होईल, असा दावा सरकारकडून केला जात असला तरी वास्तवात असे होताना दिसत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.