पालघर/ बोईसर: पालघर जिल्ह्यत उभे राहू पाहणाऱ्या वाढवण बंदराला स्थानिकांकडून सध्या जोरदार विरोध होत असला तरीसुद्धा समुद्रामध्ये भराव टाकून वसवण्यात येणाऱ्या या बंदराच्या उभारणीसाठी दगड-मातीचा शोध जिल्हा प्रशासनाने घेण्यास आरंभ केला आहे. या संदर्भात महसूल अधिकाऱ्यांची प्राथमिक बैठक झाली असून बंदराच्या उभारणी कामाला सुरुवात करण्याच्या दृष्टीने हे महत्त्वपूर्ण पाऊल समजले जात आहे. वाढवणसमोरील समुद्रामध्ये सुमारे पाच चौरस किलोमीटर भागामध्ये बंदर उभारण्याचे प्रस्तावित असून समुद्रामध्ये बंदर उभारणीसाठी मोठय़ा प्रमाणात दगड, माती, मुरूम या गौण खनिजाचा वापर करावा लागणार आहे. हे साहित्य बंदराच्या नियोजित ठिकाणापासून किती अंतरावरून उपलब्ध होईल व उपलब्ध गौण खनिजाचे गावनिहाय प्रमाण किती असेल याचा अभ्यास करण्याचे महसूल अधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले आहे. या संदर्भात जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टतर्फे पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाशी पत्रव्यवहार झाल्यानंतर ४ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली असल्याची माहिती पुढे आली आहे. बोईसर पूर्वेकडील काही गावांमध्ये असलेल्या दगडी खदाणीमधील नमुने यापूर्वी तपासण्यात आले असून त्यापैकी पाच— सहा गावांमधील खदानीमधील दगड बंदर प्रकल्पासाठी योग्य असल्याचे परीक्षणात दिसून आले आहे. या पट्टय़ातून सुमारे ३५०० लक्ष ब्रास दगड उपलब्ध होण्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त झाला असून उर्वरित दगडांसाठी विक्रमगड, वाडा व तलासरी तालुक्यातील दगड खदानींचा तसेच पालघर तालुक्यातील इतर भागांचा विचार करण्यात येत असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजले आहे. दगड खदानीसाठी राज्य शासनाच्या मालकीच्या किंवा वन विभागाच्या मालकीच्या तसेच केंद्र सरकारच्या मालकीच्या डोंगर व टेकडय़ांचा प्राधान्याने विचार केला जात असल्याचे सांगण्यात आले. त्याचप्रमाणे बोईसर पूर्वेकडील वेगवेगळ्या गावांमध्ये उत्खनन सुरू असलेल्या ठिकाणी काही खाजगी जागांमधील दगड या बंदर प्रकल्पासाठी वापरला जाणार असल्याचे स्थानिक व्यावसायिकांकडून सांगण्यात येते. त्या दृष्टीने विविध मार्गानी चाचपणी सुरू झाली आहे असेही सूत्रांकडून सांगण्यात आले. बोईसर पूर्वेकडील भागात त्यापूर्वीच मोठय़ा प्रमाणात उत्खनन होत असून त्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. या भागात खदानीमधून अनेक ठिकाणी बेकायदा उत्खनन सुरू असताना येथील खदानींची खोली प्रमाणापेक्षा अधिक झाल्याने पालघर तहसीलदाराने खोदकामावर रोख लावली आहे. बंदर प्रकल्पासाठी या भागातील दगड वाहतुकीसाठी सोयीस्कर पडणार असल्याने त्याचे प्राधान्याने उत्खनन केल्यास बंदर उभारणीच्या कामी या भागातील डोंगर— टेकडय़ा नष्ट होतील व संपूर्ण परिसर बकाल होईल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.