बडय़ा धनिकांनी कर्ज थकवल्याने बँकांना झालेला तोटा भरून काढण्यासाठी केंद्र सरकार एकीकडे ८८ हजार कोटींची तरतूद करीत असताना दुसरीकडे शेतकऱ्याकडील कर्जवसुलीसाठी त्याची भांडीकुंडी रस्त्यावर आणली जातात, त्याच्या अब्रूचे धिंडवडे काढले जात असल्याचे सांगतानाच शेतकऱ्यांबाबतीत सत्ताधाऱ्यांच्या नीती व नियतीमध्ये खोट असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.

माजी आमदार वसंतराव झावरे यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनानिमित्त त्यांचे जन्मगाव वासुंदे येथे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात पवार बोलत होते. विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. माजी मंत्री मधुकर पिचड, मा. खासदार यशवंतराव गडाख, दादा कळमकर, आ. अरुण जगताप, आ. वैभव पिचड, आ. राहुल जगताप, आशुतोष काळे, सीताराम गायकर, राजश्री घुले, मंजूषा गुंड, अविनाश आदिक, सुप्रिया झावरे, सुजित झावरे, प्रतापराव पाटील, सुदेश झावरे यांच्यासह जिल्हय़ातील व तालुक्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

पवार म्हणाले, एकीकडे पारनेर तालुका बदलत असताना दुसरीकडे ग्रामीण जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची ज्यांची जबाबदारी आहे त्यांचा प्राधान्यक्रम वेगळा आहे. बँकांना झालेला तोटा भरून काढण्यासाठी एकीकडे ८८ हजार कोटी दिले जातात, तर दुसरीकडे शेतकऱ्याचे कर्ज वसुलीसाठी त्याच्या अब्रूचे धिंडवडे काढले जातात. बँकांना झालेला तोटा शेतकरी, शेतमजूर, दलित, भटक्या विमुक्तांमुळे नाही तर धनिकांनी कर्ज थकवल्यामुळे झाला आहे. शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा दूर करून त्याला स्वाभिमानाने जीवन जगता यावे यासाठी आम्ही ७२ हजार कोटींची कर्जमाफी दिली. ५६ हजार कोटींची सरसकट कर्जमाफी करण्याची घोषणा करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्षात मात्र काही ना काही कारणे देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. फडणविसांचे सरकार कर्जमाफीच्या बाबतीत शेतकऱ्यांना उपाशी ठेवायला निघाले असून, त्यांची कर्जमाफीची घोषणा म्हणजे लबाडाघरचं जेवणाचं आवताण असल्याचा टोला त्यांनी लगावला.

सुजितला पाठबळ द्या

नव्या पिढीला शक्ती देऊन नवे नेतृत्व मोठे करायचे आहे. त्यांच्यामार्फत तुमच्या हिताची जपवणूक करायची आहे. वसंतराव झावरे यांच्यानंतर आता सुजित झावरे व त्यांच्या सहकाऱ्यांना ताकद द्यायची असून, त्यासाठी सुजित यांना पाठबळ देण्याचे आवाहन पवार यांनी केले.

डंगरे झालो नाही!

गडाख, पिचड व माझे वय ७५च्या पुढे गेले असले तरी आम्ही डंगरे झालेलो नाहीत. तुम्ही काळजी करू नका, असे सांगत पवार म्हणाले, कोणताही नांगर असो पल्टीचा असो वा सुल्टीचा, आमचा बल तासाला धरूनच चालणार, कारण शिवळे धरून दुसरीकडे पाहण्याची आमची सवय नाही. आमचं सगळं लक्ष तासावरच असतं. एकदा जमिनीत नांगराचा फाळ घातला की ती नांगरट नीटच झाली पाहिजे व त्यातून सोन्यासारखे पीक आले पाहिजे, गावचा संसार बदलला पाहिजे, एवढी एकच गोष्ट आम्हा वडीलधाऱ्यांच्या डोक्यात असल्याचे ते म्हणाले.