राज्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून वारंवार स्वबळाचा नारा दिला जात असताना आता शिवसेनेमधूनच भाजपासोबत पुन्हा युती करण्यासाठी मागणी केली जात आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलेल्या पत्रामुळे आता पुन्हा राजकीय वातावरण तापू लागलं आहे.काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेना कमकुवत करत असल्याचा दावा करतानाच भाजपाशी जुळवून घेण्याबाबत पत्र सरनाईक यांनी उद्धव ठाकरे यांना लिहिले होते. त्यावर आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना-भाजपा युती होऊ शकते असे विधान भाजपाचे खासदार गिरीश बापट यांनी केले आहे.

पुण्यात पत्रकारांशी बोलत असताना गिरीश बापट यांनी प्रताप सरनाईक यांच्या पत्रावर आपली भूमिका मांडली आहे. सरनाईक यांना भाजपाकडून त्रास दिला जात नाही आहे. यंत्रणा त्यांच्या कामाचा पाठपुरावा करत आहेत. भारतीय जनता पार्टी कोणालाही त्रास न देणारी गरीब पार्टी आहे. ती लोकांना मदत करत असते असे गिरीश बापट म्हणाले.

“संबंध अजून तुटण्याआधी भाजपाशी जुळवून घ्यावं”, शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांचं उद्धव ठाकरेंना पत्र!

“प्रताप सरनाईक यांची बोलकी प्रतिक्रिया आहे. प्रताप सरनाईक यांनी जे पत्र लिहिले आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना-भाजपा युती होऊ शकते. शिवसेना आणि भाजप गेल्या २५ वर्षांपासून एकत्र होते. नंतर अनैसर्गिक लोकांमुळे आमची तुटली होती. त्यामुळे भविष्यात युती होऊ शकते. जर युती झाली तर आम्हाला त्याचा आनंद होईल. प्रताप सरनाईक आत्ता जे बोलले ते भाजप नेते महाविकास आघाडी होत असतांना बोलत होते. त्यांचे नेते सकारात्मक विचार करतील. आता निर्णय शिवसेनेला घ्यायचाय” असे म्हणत बापट यांनी उद्धव ठाकरे यांना आवाहन केले आहे.

प्रताप सरनाईक जेलचे पाहुणे होणारच; सरनाईकांच्या ‘लेटरबॉम्ब’नंतर सोमय्यांचा इशारा

राष्ट्रवादी पश्चिम महाराष्ट्रातील छोटासा पक्ष

शनिवारी पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाबाबत प्रश्न विचारला असता बापट यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका केली. “पुणे पालिकेच्या निवडणुकीत आमचं प्राध्यान राष्ट्रवादीपेक्षा शिवसेनेला राहील. राष्ट्रवादी हा पश्चिम महाराष्ट्रातला एक छोटासा पक्ष आहे, तो काही अखिल भारतीय पक्ष नाही. अजितदादा हे शरद पवारांचे ऐकत नाही हे माहिती होतं, पण कार्यकर्ते ऐकत नाही हे माहिती झालं. त्यामुळे यातच सगळी ग्यानबाची मेक आहे”, असा टोलाही बापट यांनी लगावला.