आंबा, काजू पिकाने धोका दिला तरी कोकणातील शेतकरी आत्महत्या करीत नाही. हा शेतकरी आशावादी असून, शेती संशोधक वृत्तीने करीत असतो, असे सिंधुदुर्ग ऑरगेनिक फेडरेशनचे बाळासाहेब परुळेकर यांनी सांगून बारमाही पीक देणाऱ्या नारळाचे उत्पादन वाढवा. त्यासाठी न्यू प्राइम अॅग्रिकल्चर संस्थेने मार्केटिंगची हमी भावाने जबाबदारी घेतली आहे, असे सांगितले. न्यू प्राइम अॅग्रिकल्चर अॅण्ड मार्केटिंग मल्टिस्टेट को ऑफ सोसायटी आणि सिंधुदुर्ग डिस्टिकल ऑरगेनिज फॉर्मरस फेडरेशनच्या संयुक्त विद्यमाने नारळ व्यवस्थापक व शेतीविषयक मार्गदर्शन कार्यशाळेत बाळासाहेब परुळेकर बोलत होते. या वेळी ऑरगेनिकचे सचिव रामानंद शिरोडकर, कृषी अधिकारी काका परब, फळ संशोधनाचे प्रा. महेश शेडगे, डॉ. संतोष वानखेडे (मुळदे), खजिनदार रणजीत सावंत उपस्थित होते. या वेळी बाळासाहेब परुळेकर म्हणाले, न्यू प्राइम अॅग्रिकल्चरचे चेअरमन आदेश (आदिनाथ) येरम यांनी शेतकऱ्यांच्या उत्पादित मालास बाजारभाव मिळावा म्हणून प्रयत्न सुरू केले आहेत. सिंधुदुर्गचा नारळ मुंबईत नेऊन विक्री सुरू केली असून, आतापर्यंत सुमारे ६० हजार नारळ हमीभावाने घेऊन मुंबईत विक्री केली आहे. त्याशिवाय आंबा, काजू, कोकमवरदेखील प्रक्रिया उद्योग सुरू केले आहेत. शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला मुंबई बाजारपेठेत मार्केटिंगची संधी निर्माण केली असल्याने शेतकऱ्याला ही सुवर्णसंधी निर्माण झाल्याचे बाळासाहेब परुळेकर म्हणाले. नारळाला हमीभाव न्यू प्राइम अॅग्रिकल्चरचे चेअरमन आदेश येरम यांनी दिला आहे. आता नारळावर प्रक्रिया उद्योग उभे राहतील. सेंद्रीय शेतीला शेतकऱ्यांनी प्राधान्य द्यावे, असे आवाहन बाळासाहेब परुळेकर यांनी केले. तालुका कृषी अधिकारी काका परब यांनी शासनाच्या योजना, अपघात विमा योजनेची माहिती दिली. ते म्हणाले, शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आहेत. आता केळी लागवडीलादेखील शासनाने प्राधान्य दिले आहे. मसाले आंतरपीक म्हणूनदेखील घेता येईल. राष्ट्रीय फलोद्यान अभियानदेखील शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहे, असे काका परब म्हणाले या वेळी नारळ व्यवस्थापनावर वेंगुर्ले फळसंशोधनचे महेश शेडगे यांनी मार्गदर्शन केले. नारळ लागवड करताना १५ ते २० वर्षांच्या नारळाचे बियाणे वापरा. नारळ बागायतीत आंतरपीक घेऊन उत्पादन वाढवा, असे सांगताना नारळ लागवड व संगोपन यांची माहिती दिली. मुळदे संशोधन केंद्राचे डॉ. संतोष वानखेडे यांनी नारळ कीड प्रादुर्भावावर उपाय योजना सांगितल्या. नारळाच्या झाडाचे संरक्षण व संगोपन व संवर्धन कीड रोगापासून कसे करावेत, तसेच सेंद्रीय रासायनिक खतांबाबत माहिती दिली. रामानंद शिरोडकर यांनी नारळविषयक माहिती दिली. रणजीत सावंत यांनी सूत्रसंचालन तर अभिमन्यू लोंढे यांनी सर्वाचे स्वागत केले. या वेळी शेतकरी सदानंद देसाई, विजयकुमार पई, यशवंत आमोणेकर, अजित माणगावकर, गुरुनाथ पालव, दिगंबर शिरसाट, अनिल बांदेकर, दिलीप भाईप, भूषण आरोसकर, प्रसाद खडपकर, अवधुत धुरी, पी. एल. चव्हाण, शंकर नार्वेकर, रामचंद्र कोचरेकर, हेमंत वाळके, विठ्ठल यादव, शंकर परब, श्रीहरी चोपडेकर, श्वेतांबरी परब, लक्ष्मीकांत गावते आदी मान्यवर उपस्थित होते.