जेजुरी येथे जाणाऱ्या  मोटारीला अपघात होऊन त्यात एकाच कुटुंबातील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. पंढरपूर-पुणे मार्गावर माळशिरस तालुक्यातील वेळापूरजवळ शनिवारी सकाळी आठच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मोटारीला एका अवजड वाहनाने (मिक्सर) धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. सर्व मृत बार्शी तालुक्यातील वैराग येथील फलफले कुटुंबीयांपैकी आहेत.  मृतांमध्ये पती-पत्नी व मुलाचा समावेश आहे.

वैराग येथील  फलफले कुटुंबीय जेजुरी येथे खंडोबाच्या दर्शनासाठी मोटारीतून निघाले होते. मोटारीत आठ जण होते. वाटेत प्रथम पंढरपुरात गेल्यानंतर या सर्वानी विठ्ठल मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तेथून ते जेजुरीकडे जाताना वाटेत वेळापूरजवळ मोटारीला अपघात झाला. या भीषण अपघातात शिवराज नागेश फलफले (वय ३८) व त्यांच्या पत्नी वनिता शिवराज फलफले (वय ३०) व मुलगा उत्कर्ष (वय ९) यांच्यासह शिवराज यांचे बंधू दीनानाथ ऊर्फ बाबासाहेब नागेश फलफले (वय ३४), पुतण्या सह्य़ाद्री बाबासाहेब फलफले (वय ६) व पार्वती महादेव फलफले (वय ८०) या सहा जणांचा मृत्यू झाला. तर पूजा दीनानाथ फलफले (वय २९) व उत्कर्षां शिवराज फलफले (वय ११) या दोघी अपघातातून बचावल्या.