एजाजहुसेन मुजावर सोलापूरच्या विमानसेवेला अडथळा ठरल्याच्या कारणावरून सोलापूर विमानतळाला खेटून असलेल्या सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याची उंच चिमणी पाडून टाकण्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यापूर्वीही ही चिमणी पाडण्यासाठी पालिका प्रशासनाने पावले उचलली असता शेवटच्या क्षणी कारवाई रोखण्यात येऊन चिमणीला जीवदान मिळाले होते. त्यानंतर आता पुन्हा प्रशासनाने कारवाईसाठी पावले उचलली खरी; परंतु ऐनवेळी चिमणीला पुन:श्च दुसऱ्यांदा जीवदान मिळणार काय, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. होटगी रस्त्यावर विमानतळाला खेटूनच सिध्देश्वर सहकारी साखर कारखाना गेले सुमारे ५० वर्षे अस्तित्वात आहे. साखर कारखाना अगोदर उभारला गेला आणि नंतर विमानतळ कार्यान्वित झाले आहे. ही वस्तुस्थिती असली तरी साखर कारखान्याने उभारलेली सुमारे ९० मीटर उंच चिमणी बेकायदेशीर उभारल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. यापूर्वी, २०१५-१६ साली तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे हे जिल्हाधिकारी असताना त्यांच्या कार्यकाळात सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याच्या ही बेकायदा उभारलेली चिमणी पाडण्याच्या कारवाईचा प्रश्न सर्वप्रथम उपस्थित झाला होता. या प्रश्नावर न्यायालयीन लढाईही झाली. त्यातून काही दिवस चिमणी पाडण्याची कारवाई रोखली गेली तरी दुसऱ्यांदा पुन्हा कारवाई हाती घेण्यात आली असता त्यात ही चिमणी पाडण्यासाठी महापालिकेने नाशिकच्या एका कंत्राटदाराला सुमारे ३४ लाख रुपये खर्चाचा मक्ताही दिला होता. शासनाने शेवटच्या क्षणी त्यास तात्पुरती स्थगिती दिली होती. सद्य:स्थितीत कारखान्याच्या चिमणीचा वाद न्यायालयात प्रलंबित असला तरी त्यावर कारवाईला कोणतेही स्थगिती आदेश नाहीत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे पालिका आयुक्तपदाची हंगामी सूत्रे आल्यानंतर त्यांनी सिध्देश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडण्यासाठी कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पालिका प्रशासनाने सिध्देश्वर साखर कारखन्याला सात दिवसांच्या मुदतीची नोटीस बजावली आहे. ही मुदत संपली असली तरी त्यादृष्टीने चिमणी पाडून टाकण्याची कोणत्याही हालचाली कारखान्याकडून होत असल्याचे दिसून येत नाही. तर उलट, ऊस गाळप हंगामाच्या तोंडावर चिमणी पाडून टाकण्याची कारवाई हाती घेण्यात आल्याचा मुद्दा कारखान्याने पुढे करून गाळप हंगाम संपेपर्यंत चिमणीला मुभा द्यावी, अशी विनंती सिध्देश्वर कारखान्याने केली आहे. परंतु ही विनंती मान्य होऊन चिमणीला मुभा दिली जाणार की, प्रत्यक्ष ठरल्याप्रणाणे कारवाईचा बुलडोझर चिमणीवर पडणार, याकडे सर्वाचे लक्ष वेधले आहे. कारखान्याची बेकायदेशीर उंच चिमणी पाडून टाकण्याची कारवाई एकीकडे हाती घेण्यात येत असताना यापूर्वीचा अनुभव विचारात घेता दुसरीकडे ही कारवाई खरोखरच अमलात येणार की शेवटच्या क्षणी त्याला खो बसणार, याविषयी प्रश्नार्थक चर्चा सुरू आहे. वीरशैव लिंगायत समाजातील मोठे प्रस्थ मानले जाणारे धर्मराज काडादी यांच्याकडे अनेक वर्षांपासून सिध्देश्वर साखर कारखान्याचा कारभार आहे. चिमणी का पाडायची? सोलापूर विमानतळालगतच सिध्देश्वर साखर कारखान्याची उंच चिमणी बेकायदेशीर स्वरूपात अस्तित्वात असल्यामुळे तिचा विमानसेवेला अडथळा येतो. तीन वर्षांपूर्वी केंद्र सरकारने देशातील अनेक शहरांसाठी विमानसेवेसाठी ‘उडान योजना’ जाहीर केली होती. त्यात सोलापूरचाही समावेश झाला होता. ही उडान योजना अन्य अनेक शहरांसाठी प्रत्यक्षात सुरूही झाली आहे. परंतु सोलापुरात ‘सिध्देश्वर’च्या उंच चिमणीचा अडसर ठरल्यामुळे ‘उडान सेवा’ अद्यापि सुरू झाली नाही. विमानसेवेअभावी सोलापूरचा विकासही खुंटला आहे. त्यामुळेच विमानसेवा विनाअडथळा सुरू होण्यासाठी सिध्देश्वर कारखान्याची उंच चिमणी पाडण्याची कारवाई हाती घेणे प्रशासनाला भाग पडले आहे.