राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या मुंबईतील बैठकीनंतर ईव्हीएम मशीनवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली. शरद पवार यांनी ईव्हीएमवर उपस्थित केलेली शंका म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे अशी असल्याची टीका मुनगंटीवार यांनी केली. वर्ध्यात खरीप हंगामपूर्वी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर बोलतना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

दरम्यान, धूल थी चेहरे पे ओर आईना साफ करते रहे, अशाप्रकारचे राजकारण सध्या सुरू आहे. निवडणुका जिंकता येत नसल्याचे त्याचे खापर ईव्हीएमवर फोडले जात असल्याचे ते म्हणाले. गेले 47 वर्षे त्यांच्याकडे सत्ता होती. परंतु आजही त्यांना आम्ही सर्व प्रश्न सोडवले असा दावा करता, येत नसल्याचेही मुनगंटीवार म्हणाले.

ईव्हीएम मशीन आणि त्यांच्या संख्येबाबत माझ्या मनात फार आधीपासून शंका होती. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड इथे भाजपची सत्ता असताना भाजपाचा पराभव झाला आणि काँग्रेस पार्टी विजयी झाली. पण कदाचित हा पराभव देशाच्या निवडणुका जिंकण्यासाठी तर नाही, अशी शंका माझ्या डोक्यात आली होती, असे शरद पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते. तसेच आता तेथील सरकार भाजपा पाडण्याच्या विचारात असल्याचेही त्यांनी नमूद केले होते.

निवडणूक यंत्रणेबाबत यावेळी निवडणुकीत अधिक विचार करण्यात आला. आपले मत बरोबर गेले अथवा नाही याबाबत सर्वांना शंका वाटत आहे. तसेच अशी शंका यापूर्वी कधी कोणाच्याही मनात निर्माण झाली नव्हती. आजही लोकांच्या मनात ही शंका कायम आहे. देशात सत्ताबदल होणार, असे अनेक अभ्यासक, जाणकार, पत्रकार, राजकीय नेते यांचे मत होते. मात्र झाले उलटेच, लोकसभा निवडणुकांचा निकाल अत्यंत वेगळा लागला, असे म्हणत त्यांनी ईव्हीएमच्या विश्वासार्हतेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.