औरंगाबादजवळील ५०० एकरवरील बागा धोक्यात औरंगाबाद : मागील पंधरा दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली. पडतो त्याने पाणीही जमिनीत मुरत नाही. पाऊस नसल्याने मृग बहार झडून पडला आहे. आता त्याचा परिणाम मार्च-एप्रिल-मे च्या दरम्यान निघणाऱ्या उत्पादनावर होणार आहे. एकरी एक लाखाच्या नुकसानीचा फटका बसणार आहे. आडगावचे मोसंबी उत्पादक अशोक लोखंडे सांगत होते. पिंप्री राजाचे बद्रिनाथ पवार यांच्या नुकसानीची आकडेवारी लोखंडे यांच्यापेक्षा अधिक आहे. बद्रिनाथ पवार यांची तीन एकरवर मोसंबीची बाग आहे. त्यांचे नुकसान तीन लाखांवर आहे. औरंगाबादजवळच्या काही गावांमध्ये लोखंडे आणि पवार यांच्यासारखे अडीचशेच्या वर असलेले मोसंबी उत्पादक सध्या अडचणीत सापडले आहेत. औरंगाबादजवळील आडगाव, एक्कड-पाचोड, पिंपरी राजा, चितेगाव, जडगाव, सांजखेडा, गारखेडा या गावांमध्ये मोठय़ा प्रमाणात मोसंबीच्या बागा आहेत. एकटय़ा पिंपरी राजात २०० ते २२५ एकरवर मोसंबीचे उत्पादन घेतले जाते. तर आडगावात ४० ते ५० एकरवर मोसंबीच्या बागा आहेत. वरील सर्व गावांमधील मोसंबीचे क्षेत्र सुमारे ५०० एकरपेक्षाही अधिकचे आहे. हे सर्व उत्पादक शेतकरी सध्या पावसाअभावी अडचणीत सापडले आहेत. साधारणपणे मृग नक्षत्र सुरू झाल्यानंतर पडणाऱ्या पावसावर मोसंबीच्या झाडांना बहार फुटतो. त्याला मृग बहार म्हणतात. या बहारवर मार्च-एप्रिल महिन्यात येणाऱ्या मोसंबीतून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या उत्पादनाचे भवितव्य ठरते. मात्र पावसाअभावी मृग बहारच गळून पडल्याने मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांपुढे नवे संकट उभे राहिले आहे. अशोक लोखंडे सांगत होते, की पावसाअभावी विहिरी, बोअरलाही पाणी नाही. त्यामुळे मोसंबीलाही पाणी देता येत नाही. दीड एकरातील ३२५ झाडांचा मृग बहार झडला आहे. त्यामुळे मोसंबीतून मिळणारे दीड ते दोन लाखांच्या उत्पादनावर पाणी फेरले गेले. मोसंबीला मृग आणि अंबे, अशी दोन बहार असतात. त्यातील एक तर झडला आहे. मोसंबीशिवाय उर्वरित शेतात मका आहे. तोही सध्या सुकू लागला आहे. आता दुबार पेरणीही शक्य नाही. खरीप हातचा गेला आहे. औरंगाबादजवळील अनेक गावांतील मोसंबी उत्पादक, शेतकरी सध्या पावसाअभावी अडचणीत सापडले आहेत.