राज्यात चालू गळीत हंगामात ८१ साखर कारखान्यांचे हंगाम सुरळीत चालू असून, त्यांनी आजपर्यंत ४३ लाख २९ हजार ७९२ टन उसाचे गाळप करून त्यापासून ३४ लाख ४७५ साखर पोत्याचे उत्पादन केले आहे. सरासरी साखरेचा उतारा मात्र ९.५० टक्के मिळाला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी उसाच्या पहिल्या उचलीबाबत सुरू केलेल्या आंदोलनामुळे कोल्हापूर, सातारा, सांगली या भागातील साखर कारखान्यांचे गाळप अद्यापही सुरळीत सुरू झालेले नाही. त्यामुळे ऊसतोडणी कामगारांच्या हाताला काम नाही, अशी अवस्था निर्माण झाली आहे.
अहमदनगर जिल्ह्य़ात १९ साखर कारखान्यांपैकी गणेश, केदारेश्वर, साईकृपा, पारनेर आणि नगर तालुका या पाच कारखान्यांचे गाळप यंदा बंद आहे. आताचा अंबालिका आणि पूर्वीचा जगदंबा कारखान्याने जिल्ह्य़ात साखर उताऱ्यात १०.३० टक्के अशी आघाडी घेतली आहे, तर सर्वाधिक उसाचे गाळप ज्ञानेश्वर कारखान्याने केले आहे. जिल्ह्य़ात १४ साखर कारखान्यांनी आजपर्यंत ८ लाख १६ हजार ६१३ टन उसाचे गाळप करून त्यापासून ६ लाख ९१ हजार ९६० साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे, तर सरासरी उतरा ९.०६ टक्के मिळाला आहे. प्रसाद शुगरच्या गाळपाची आकडेवारी उपलब्ध झाली नाही. थंडीचा कडाका काही प्रमाणात वाढला आहे.