एमबीबीएसच्या पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाच्या परीक्षा आता जून महिन्यात होणार असल्याचं वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी आज सांगितलं आहे.  या परीक्षा जूनच्या पहिल्या आठवड्यात होणार आहेत. वाढत्या करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आता या परीक्षा जून मध्ये होणार असल्याचं अमित देशमुख यांनी सांगितलं आहे. विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून परीक्षा घेण्याची आमची भूमिका नाही, असं अमित देशमुख यांनी या अगोदर बोलून दाखवलं होतं.

“परीक्षांमुळे विद्यार्थ्यांचं परीक्षा केंद्रावर येणंजाणं किंवा अन्य ठिकाणी जाण्यात बऱ्याच अडचणी येत होत्या. शिवाय अनेक विद्यार्थ्यांना देखील करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. हे सर्व पाहता परीक्षा पुढे ढकलणं शक्य असल्याने, आम्ही हा निर्णय घेतला.” असं अमित देशमुख यांनी सांगितलं आहे.

मोठी बातमी! मेडिकलच्या परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय

तर, या अगोदर या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचा निर्णय जाहीर करताना, “महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत १९ एप्रिलपासून घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा मुख्यमंत्र्यासोबत झालेल्या चर्चेनंतर जूनमध्ये घेण्यात येणार आहेत. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात येईल. या परीक्षा पुढे ढकलण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याशीही चर्चा झाली आहे”. असं अमित देशमुख यांनी सांगितलं होतं.

विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून परीक्षा घेण्याची आमची भूमिका नाही, मात्र विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल, मुख्यमंत्री, नॅशनल मेडिकल कौन्सिल, केंद्रीय आरोग्य मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण विभाग यांच्याशी चर्चा करून परिक्षांसंदर्भात पुढील ७२ तासात निर्णय घेऊ असं ते म्हणाले होते.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील ४५० प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना करोना

राज्यातील विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील सुमारे ४५० प्रशिक्षणार्थी डॉक्टर आणि त्यांच्या संपर्कातील ३५० जण करोना संसर्गाने ग्रासले आहेत. त्यामुळे प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना चांगल्या आरोग्य सुविधा द्याव्यात, तसेच १९ एप्रिलला सुरू होणाऱ्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांकडून करण्यात आली आहे.

तर, या अगोदर “राज्यभरात कोविड१९ चा प्रादुर्भाव झाला असून दिवसेंदिवस रुग्णसंख्येत भर पडत आहे. या परिस्थितीत दि. १९ एप्रिल ते ३० जुन दरम्यान वैद्यकीय शाखेच्या परीक्षा होत आहेत. परंतु सुमारे ४५० विद्यार्थी व तेवढेच पालक करोनाग्रस्त आहेत. याशिवाय अभ्यासाची साधने विद्यार्थ्यांना सध्या उपलब्ध नाहीत. जवळपास ५० हजार विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. ही संख्या लक्षात घेता सद्यस्थितीत करोना विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे. हे लक्षात घेता वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख आपणास विनंती आहे की, कृपया या विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करुन परीक्षांबाबत आपण योग्य तो निर्णय घ्यावा.” असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होतं.