कोल्हापूरची जीवनदायिनी असणारी पंचगंगा नदी विविध घटकांकडून होणाऱ्या प्रदूषणामुळे देशातील प्रमुख दूषित नदी पैकी एक बनली आहे. नदी दूषित करणाऱ्या प्रमुख घटकांमध्ये कोल्हापूर महापालिका व इचलकरंजी नगरपालिकेच्या मैलायुक्त सांडपाण्याचा मोठा वाटा आहे. याला अन्य उद्योग, साखर कारखाने यांचीही जोड मिळत आहे. गेली पंधरा ते वीस वर्षे या प्रमुख तीन घटकांकडून नदीचे पाणी दूषित केले जात असताना त्याला आवर घालण्यात प्रदूषण नियंत्रण मंडळ अपयशी ठरले आहे. प्रदूषणाची ओरड झाली की ‘कारणे दाखवा’ नोटीस सारखे थातूर मातूर कारवाई केली जाते. मंडळाच्या या निष्क्रीय कारभाराबद्दल जनतेत तीव्र नाराजी आहे.