गंगागिरीमहाराज सप्ताहाची उद्या सांगता राहुरी तालुक्यातील तांदुळनेर येथे सुरू असलेल्या १६९व्या सद्गुरू गंगागिरीमहाराज सप्ताहाची सांगता सोमवारी लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणार आहे. अखंड १६८ तास भजन, लाखो भाविकांना एकाच वेळी महाप्रसादाचे वाटप आणि त्यासाठी गावागावांतून संकलित होणाऱ्या लाखो भाकरी, एकाच वेळी तयार होणारी तब्बल ४ हजार लीटर आमटी, अहोरात्र आमटी-भाकरी प्रसाद ही सप्ताहाची वैशिष्टय़े आहेत. त्यामुळेच या धार्मिक उपक्रमाची यंदा जागतिक विक्रमाकडे वाटचाल सुरू आहे. सद्गुरू गंगागिरीमहाराज अखंड हरिनाम सप्ताहाचे यंदाचे शतकोत्तर ६९वे वर्ष आहे. सात्रळ, सोनगाव, धानोरे, पाथरे बुद्रुक, हनुमंतगावसह राहाता, राहुरी व संगमनेर तालुक्यांतील २१ गावांच्या वतीने त्याचे आयोजन करण्यात आले आहे. सरला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरीमहाराज यांचे मार्गदर्शन लाभले आहे. सप्ताहस्थळीच राज्यस्तरीय कृषिप्रदर्शन, व्यसनमुक्ती, नेत्रदान, जलसाक्षरता, वनसंवर्धन यासह महिला बचतगटांचे प्रदर्शनही भरविण्यात आले आहे. या हरिनाम सप्ताहासाठी तांदुळनेर येथील खंडोबाच्या माळावर तब्बल ५०० एकर जागेवर २० ते २५ लाख भाविक बसू शकतील, असा ‘वॉटरप्रूफ’ महामंडप उभारण्यात आला आहे. आमटी आणि भाकरी हा प्रसाद या सप्ताहाचे मुख्य आकर्षण असून, त्यासाठी २० मोठय़ा कढयांमध्ये एकाच वेळी १० हजार लीटर आमटी बनवली जाते. ती विद्युत मोटारीने टँकरमध्ये भरून पंगतीत वाढली जाते. प्रसादासाठी दररोज ११०० ते १२०० गावांमधून विनामूल्य भाकरी येतात. सप्ताहाच्या ठिकाणी येवला तालुक्यातील सावरगाव येथील ३०० पुरुष व २०० महिला परिसरात स्वच्छतेचे काम करतात. ६० भट्टय़ा, ४०० कारागीर महाप्रसाद बनवण्यासाठी ६० भट्टय़ा आणि ४०० कारागीर कार्यरत आहेत. सांगतेसाठी येणाऱ्या लाखो भाविकांसाठी ४५१ क्विंटल बुंदी, २५० क्विंटल खिचडी, ६०० पोती चिवडा, २५ क्विंटल शेव बनवण्याचे काम अहोरात्र सुरू आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे स्वत: गेल्या तीन दिवसांपासून सप्ताहस्थळी तळ ठोकून आहेत. विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे हेही सुरुवातीपासून पंगती व प्रसादाच्या नियोजनात सक्रिय आहेत. या सप्ताहामध्ये सलग तब्बल १६७ तास भजन-गायन होणार आहे.