उमरगा तालुक्यातील कोळसुर येथील दयानंद नगर तांड्यावर शोककळा पसरली आहे. गुरुवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास तांड्यावरील तीन मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रस्त्यावर भर टाकण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचले होते. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ही मुले खड्ड्यात बुडून मृत्यू पावली आहेत.

उमरगा तालुक्यातील कोळसुर कल्याणी येथील दयानंद नगर तांड्यावरील तीन मुलांचा दुर्दैवी अंत झाला आहे. ही दुर्घटना गुरुवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली. यात दोन मुली आणि ऐका मुलाचा समावेश आहे. अंजली संतोष राठोड (वय १२), प्रतीक्षा मधुकर पवार (वय ९) आणि ओंकार राजुदास पवार (वय ९) अशी मृत मुलांची नावे आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. स्थानिकांच्या मदतीने तिघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढून शवविच्छेदनासाठी उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. खड्डे खोल असल्याने व पाण्याचा अंदाज न आल्याने या बालकांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.