नगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील पद्मश्री विखे पाटील सहकारी साखर कारखान्यात मळीच्या टाकी दुरुस्तीच्या वेळी स्फोट होऊन बुधवारी तीन जण ठार, तर १५ जण जखमी झाले आहेत. या कारखान्याचे आधीचे नाव प्रवरानगर सहकारी साखर कारखाना असे आहे. सकाळी साडेदहा वाजता ही घटना यंत्रणेची दुरुस्ती सुरू असताना घडली. कारखान्याचे अध्यक्ष सुजय विखे व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी लगेच कारखान्याला भेट देऊन या घटनेबाबत दु:ख व्यक्त केले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.