पर्यटनासाठी गणपतीपुळे येथे आलेल्या तिघांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. तिघेही कोल्हापूर येथील रहिवासी आहेत. यातील दोघांचे मृतदेह सापडले असून, एकाचा शोध सुरू आहे. ही घटना शनिवारी पहाटे घडली.

काही तरुण-तरुणींसह काजल जयसिंग मचले (१८), सुमन विशाल मचले (२३) या कोकणात फिरायला आल्या होत्या. गणपतीपुळे येथील मंदिरात दर्शन घेतल्यानंतर ते समुद्र किनाऱ्यावर फिरायला गेले होते. पाण्यात उतरल्यानंतर खोलीचा अंदाज न आल्याने एका तरुणासह काजल जयसिंग मचले, सुमन विशाल मचले हे तिघे समुद्रात बुडाले. तिघांचा शोध सुरू केल्यानंतर दोन्ही तरुणींचे मृतदेह सापडले असून बागडे आडनावाच्या तरुणाचा शोध घेण्यात येत आहे.

सुरक्षा रक्षक वेळीच धावून आल्याने चार जणांचे प्राण वाचले. बुडालेले तिघेही कोल्हापुरातील कसबा बावडा येथील राहतात आहेत. हे तिघेही मुळचे कर्नाटकातील असून कामानिमित्त कोल्हापुरात असल्याचे समजते.