पालघर जिल्ह्यात कासा पोलीस ठाण्याच्या  हद्दीमध्ये गडचिंचले येथे दोन साधू व त्यांच्या वाहन चालकाची हत्या झाल्यानंतर कासा पोलिस ठाण्यातील 35 कर्मचाऱ्यांची जिल्ह्यामध्ये अन्य ठिकाणी बदली करण्यात आली आहे.

मुंबईहून गुजरातकडे 16 एप्रिलच्या रात्री निघालेल्या दोन साधू (महंत) व त्यांच्या वाहनचालकाची निर्घुण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी कासा पोलीस ठाण्यातील दोन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. याप्रकरणी गुन्हा अन्वेषण विभागाकडून तपास सुरू असून या हत्याकांडामध्ये सहभागी असलेल्या सुमारे 400 ते 500 आरोपींपैकी पोलीसांनी आजवर 101 आरोपी पकडले आहेत. इतर आरोपी हे जवळपास जंगलात व डोंगरामध्ये लपल्याची शक्यता पाहता ड्रोनच्या मदतीने पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

दरम्यान कासा पोलीस ठाण्यात असलेल्या 35 कर्मचाऱ्यांची पालघरच्या पोलीस अधीक्षक यांनी जिल्ह्यात इतरत्र बदली केली असल्याची माहिती पुढे आली आहे. जिल्ह्यातील इतर पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना कासा पोलीस ठाण्यात पाठवण्यात येईल असे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले.