सोलापूर : ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या कुटुंबीयांच्या मालकीचा असलेला करकंब (ता. पंढरपूर) येथील गेली सहा-सात वर्षे बंद राहिलेला विजय साखर कारखाना माढय़ाचे राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे यांच्या विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने खरेदी केला आहे. या साखर कारखान्यावर सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सुमारे १८३ कोटींची कर्ज थकबाकी होती. बँकेने या साखर कारखान्याचा लिलाव पुकारला असता त्यात आमदार शिंदे यांच्या विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने भाग घेऊन १२५ कोटी १० लाख रुपयांस खरेदी केला. पंढरपूर तालुक्यातील करकंब येथे मोहिते-पाटील कुटुंबीयांनी खासगी तत्त्वावर विजय साखर कारखान्याची उभारणी केली होती. त्यासाठी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कर्ज घेण्यात आले होते. परंतु हा साखर कारखाना सुरू झाल्यानंतर त्याच वर्षीच्या हंगामात साखरेचे गडगडलेले दर आणि अन्य कारणांमुळे सुरूवातीपासूनच अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेने दिलेल्या कर्जाची थकबाकी वाढली होती. दरम्यान, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मंडळ बरखास्त होऊन प्रशासकीय कारभार सुरू झाल्यानंतर प्रशासक शैलेश कोथिंबिरे यांनी थकीत कर्जवसुलीसाठी व्यापक प्रयत्न हाती घेतले. यात करकंब येथील मोहिते-पाटील यांच्या विजय साखर कारखान्याची मालमत्ता यापूर्वीच जप्त करण्यात आली होती. अखेर कारखान्याचा लिलाव पुकारण्यात आला असता त्यात माढय़ाचे आमदार बबनराव शिंदे यांच्या विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने भाग घेऊन विजय साखर कारखाना खरेदी केला. १२५ कोटी १० लाख रुपये किमतीची बोली लिलावात मान्य करण्यात आली. या खरेदीमुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उच्च अनुत्पादक कर्जाचे (एनपीए) कमी होण्यास मदत होणार आहे. परिणामी, बँकेला येत्या जून-२०१२ पासून शेतक ऱ्यांना शेतीसाठी कर्ज वाटप करण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचे बँकेचे प्रशासक कोथिंबिरे यांनी सांगितले. सोलापूर जिल्ह्य़ाच्या राजकारणात मोहिते-पाटील व बबनराव शिंदे हे विरोधक समजले जातात. या पाश्र्वभूमीवर शिंदे यांनी मोहिते-पाटील यांच्या मालकीचा विजय साखर कारखाना विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून खरेदी केल्याने हा चर्चेचा विषय झाला आहे.