प्रशांत देशमुख ग्रामीण भागात बँकिंग व्यवहार करण्याची बाब अनेक गावकऱ्यांसाठी डोकेदुखीची ठरते. मात्र, आता त्यांच्यासाठी हे व्यवहार सुलभ व्हावेत म्हणून ‘एक ग्रामपंचायत, एक बँकसखी’ हा महिला बचतगटाचा उपक्रम सोयीचा ठरणार आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बँक शाखांचे जाळे विस्तारले आहे. परंतू बँकेत कर्ज व अन्य योजनांविषयी व्यवहार करताना ग्रामस्थांना अनेक अडचणी येतात. विविध अर्ज भरून देताना त्यांची त्रेधातिरपिट उडते. अर्जही चुकतो व योजनांपासून वंचित ठरण्याची उदाहरणे नेहमीची ठरली आहेत. ही बाब हेरून जिल्हा परिषदेच्या जीवनोन्नती अभियान उमेदतर्फे बँक व ग्रामस्थ यांच्यातील दुवा म्हणून महिला बचतगटांना संधी देण्यात आली आहे. बहुतांश राष्ट्रीयकृत बँकात बँकमित्र म्हणून सेवा देणारे नेमले आहेत. पण तुलनेने त्यांची संख्या खूपच कमी असल्याने बँकेच्या नियमित कर्मचाऱ्यांवर ग्राहकांना हाताळण्याची जबाबदारी असते. याच पार्श्वभूमीवर बँकसखी म्हणून बचतगटाच्या महिला कार्य करणार आहेत. डिजिटल माध्यमातून पैसे काढणे व जमा करणे, अन्यत्र पाठविणे अशा सेवा बँकसखी देत आहे. ज्या ग्रामपंचायत परिसरातील बँकेत बँकमित्र उपलब्ध नाही, अशा ठिकाणी या बँकसखी विविध माध्यमातून ग्राहकांना मदत करीत आहे. त्यासाठी उमेदतर्फे मार्फो (मोबाईलसारखे) हे उपकरण सखींना देण्यात आले असून त्यासाठी ग्राहकाचा आधार क्रमांक बँकखात्याशी संलग्न असणे अनिवार्य असल्याचे अभियान व्यवस्थापक स्वाती वानखेडे यांनी सांगितले. विभागीय सल्लागार राजेंद्र बरडे यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम जिल्ह्यात यशस्वी करण्याचे प्रयत्न होत असल्याचे त्या म्हणाल्या. सध्या बँकेत कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यातच पिककर्ज व अन्य कामांसाठी ग्रामस्थांची गर्दी उसळली आहे. हा ताण बँकसखी दूर करीत असल्याचे चित्र दिसून येते. शहरी भागात डिजिटल आर्थिक व्यवहार होत असले तरी ग्रामीण भागात त्याला प्रतिसाद नाही. मात्र अशा पध्दतीचे व्यवहार या काळात आवश्यक ठरत असल्याने बँकसखीचा पर्याय उमेदने पुढे केल्याचे प्रकल्प संचालक सत्यजित बडे यांनी नमूद केले. कुठलाही अतिरिक्त खर्च न करता दिलेल्या उपकरणातून या सखी गावकऱ्यांचे व्यवहार सुलभ करीत आहे. बचतगटातील महिलांना बँकसखी म्हणून मिळत असलेली पसंती ग्रामीण भागातील बँक अधिकाऱ्यांसाठी आनंदाची बाब ठरली आहे. बँक कर्मचाऱ्यांचा वेळ वाचतोच. पण त्यासोबतच गावकऱ्यांचेही व्यवहार तत्परतेने होत असल्याचे म्हटले जाते. या बँकसखी म्हणून कार्यरत महिलांना रोजगाराचे हे एक नविनच माध्यम उपलब्ध झाले आहे. झालेल्या व्यवहारावर त्यांना काही कमिशन मिळतेच. पण अतिरिक्त काम केल्यास त्याचे मानधन देण्याची तयारीही बँकेने दाखविली आहे. काही बँकसखींनी गरजू महिलांना त्यांच्या घरापर्यत जावून मदत केल्याची उदाहरणे असल्याचे आर्थिक व्यवस्थापक सिध्दार्थ भोतमांगे म्हणाले. बँकमित्र नसणाऱ्या या बँकेत या सखीच आता बँकांचा आधार झाल्याची त्यांनी सांगितले. ग्रामपंचायत स्तरावर आर्थिक व्यवहार पूर्ण होण्याची सध्या गरज आहे. बँकेअंतर्गत चालणाऱ्या विविध योजना ग्राहकांपर्यत पोहोचविण्यासाठी बँकसखी उपयुक्त ठरत असल्याने प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर बँकसखीची निवड संयुक्तीक ठरेल, असे मत व्यवस्थापक मनिष कावडे यांनी व्यक्त केले.