गुरु पौर्णिमेचा मुहूर्त साधून पूजेला गेलेल्या दोन कुमारवयीन मुलांचा सेल्फीच्या नादात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी वर्धा जिल्ह्यात घडली.

पोलिसांच्या माहितीनुसार, कारंजा तालुक्यातील उमरी येथील तेजस राजेश चोपडे (वय १५) आणि हर्षल संजय चौधरी अशी मृत मुलांची नावे आहेत. गुरुपौर्णिमा निमित्त हे दोघे आपल्या तीन मित्रांसह धावसा हेटी येथील दुर्गा देवी मंदिरात दुपारी चार वाजता पूजेसाठी गेले होते. त्यानंतर लगतच्या तलावावर ते पोहचले. इथे पाचही जण सेल्फी काढण्याचा आनंद घेत असतानाच तेजस आणि हर्षल मागे मागे सरकत गेले, त्यांचे संतुलन गेल्याने दोघेही तलावात पडले. तलावातील खड्ड्यात पडल्याने ते गटांगळ्या खाऊ लागले पोहता येत नसल्याने दोघांचाही बुडून मृत्यू झाला.

त्यांच्या सोबतच्या मित्रांनी मदतीसाठी आरडाओरडा केला पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. मुलांचा आवाज ऐकून परिसरातील गावकरी घटनास्थळी जमा झाले. त्यांपैकी काहींनी मच्छीमारांना बोलावले. त्यानंतर सहा वाजता या दोघांचे मृतदेह तलावाबाहेर काढण्यात यश आले. कारंजा पोलीस याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.