भारतातील ना हिंदू, ना मुस्लिम कोणताही धर्म धोक्यात नाही . धर्माच्या नावावर राजकारण करून मलई खाऊ पाहणारे धोक्यात आहेत, असे स्पष्ट मत जमियत उलेमा-ए-हिंद या संस्थेचे सरचिटणीस व माजी खासदार मौलाना महमूद मदनी यांनी कोल्हापूर येथे शुक्रवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. देवबंद दारुल या मुस्लिम समाजात फतवा काढण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या धार्मिक तसेच शिक्षण संस्थेचे प्रमुख असलेले महमूद मदनी यांनी मानवी जीवनातील धर्माचे स्थान या मुद्यावर भूमिका मांडली. यावेळी ते म्हणाले, अजानसाठीचा आवाज बंद होणार नाही. पण वाद होणार नाही अशा पद्धतीने आवाज मर्यादा कमी केली पाहिजे. सार्वजनिक गणेश वा अन्य हिंदूंच्या उत्सवावेळीही ध्वनी मर्यादा राखली पाहिजे. मुळात भारतीय हा धार्मिक स्वभावाचा आणि सहिष्णू वृत्तीचा आहे. कोणताही धर्म जोडण्याचे काम करत असतो मोडण्याचे नाही हे लक्षात घेतले पाहिजे. धर्माच्या नावावर राजकारण खेळले जाते तेव्हा तो मोडण्याच्या अवस्थेत येतो. खरेतर, हिंदू वा मुस्लिम असा कोणताच धर्म धोक्यात नाही. त्याचे राजकारण करून मलई चाखू पाहणारे मात्र धोक्यात आहेत. आरक्षणाची फेरमांडणी होण्याची गरजही महमूद मदनी यांनी व्यक्त केली. कोणत्याही धर्मातील मागास असणाऱ्यांना आरक्षण दिले पाहिजे. याचवेळी गुणवत्ता असणाऱ्यांचा हक्क डावलला जाणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. असेच व्यापक स्वरूपाचे आरक्षण पुढे येण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. मुस्लिमांच्या देशभक्तीबद्दल प्रश्न उपस्थित करण्याची गरज नाही, असा स्पष्ट शब्दात निर्वाळा देऊन मदनी म्हणाले, देशरक्षणासाठी मुस्लिमांच्या रक्ताचा थेंब आणि थेंब कार्यरत राहील. भारतीय मुस्लिमांनी स्वनिवडीने भारतीयत्व स्वीकारले आहे. पाकिस्तानमध्ये जाण्याची संधी डावलून ते या भूमीचेच पुत्र बनले आहेत, हे सुद्धा लक्षात ठेवले पाहिजे. भारतात कधीच वाईट दिवस आलेले नव्हते आणि अजूनही काही बिघडलेलेही नाही. मुस्लिमांनी प्रामाणिकपणे मेहनत घेतली तर त्यांची प्रगती कोणी थांबवू शकत नाही,अशी निःसंदिग्ध ग्वाही त्यांनी दिली.