सध्या राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असतानाच आता मराठा क्रांती मोर्चानेही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. कमळावर बहिष्कार हीच आमची भूमिका आहे, असे सांगत मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा केली आहे. भाजपाच नव्हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही मराठा समाजावर अन्यायच केला, असे क्रांती मोर्चाने म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोपर्डी खटल्यातील आरोपींना फाशीची शिक्षा, अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कायद्यात बदल, कर्जमाफी, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी अशा विविध मागण्यांसाठी राज्यातील मराठा समाज रस्त्यावर उतरला होता. यातील आरक्षणाची मागणी वगळता अन्य मागण्यांची पूर्तता झालेली नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळाले असले तरी हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी मागण्या मान्य केल्या नाही तर निवडणुकीत कमळावर बहिष्कार टाकू, असा इशाराच मराठा संघटनांनी दिला होता.  या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची शनिवारी मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला.

मोर्चे काढून काहीही साध्य होणार नाही, दबाव आणणे हीच आमची मुख्य भूमिका असून प्रत्येक स्तरावर आमची फसवणूक करण्यात आली, अशी टीका या बैठकीत करण्यात आली. कमळाने फसवले, अशी सुमारे तीन कोटी पत्रके छापून त्याचे वाटप केले जाईल, अशी माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will contest lok sabha election 2019 want to defeat bjp says maratha kranti morcha
First published on: 23-02-2019 at 12:21 IST