गेल्या ४ डिसेंबरला गडचिरोली पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत नक्षलवादी नेता नर्मदाक्का व भास्कर यांच्यासह सहा नक्षलवादी ठार झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. नक्षलवाद्यांच्या या मृत्यूला महाराष्ट्र, तसेच छत्तीसगड पोलिसांनी दुजोरा दिला आहे, तर नक्षलवाद्यांनी मात्र मौन बाळगले आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेली नर्मदा मूळची आंध्रप्रदेशातील असून गेल्या ३० वर्षांंपासून सक्रीय व या चळवळीची संस्थापक सदस्य होती. मृत्यूसमयी ती ६० वर्षांंची होती.  नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीची सदस्य असलेली नर्मदा गेल्या काही वर्षांंपासून दक्षिण गडचिरोलीत वास्तव्याला होती. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेली नर्मदा मूळची आंध्रप्रदेशातील असून ती या चळवळीची संस्थापक सदस्य होती. दक्षिण गडचिरोलीत सक्रीय असलेल्या शेखरच्या आत्मसमर्पणानंतर भास्करने या भागाचा विभागीय सचिव म्हणून नुकतीच जबाबदारी सांभाळली होती. चळवळीतील दोन बडे नेते, अशी या दोघांची ओळख होती. आता हे दोघेही ठार झाल्याला महाराष्ट्र व छत्तीसगडच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी, तसेच गुप्तचर यंत्रणांनीही दुजोरा दिला आहे. सी-६० च्या जवानांचे हे मोठे यश मानले जात असले तरी या घटनेमुळे हादरलेल्या नक्षलवाद्यांनी मात्र अद्याप मौनच पत्करलेले आहे.     

अशी झाली चकमक..
गडचिरोली पोलीस दलातील सी-६० च्या जवानांचे एक पथक एटापल्ली तालुक्यातील गट्टा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून वांगेतुरी मार्गे हिकेरच्या जंगलात शोध मोहीम राबवत असताना छत्तीसगडच्या सीमेवरील पर्लकोटा नदीच्या पात्रात काही महिला व पुरुष नक्षलवादी आंघोळ करताना त्यांना दिसले. या जवानांनी या संपूर्ण परिसराची बारकाईने पाहणी करून नाकेबंदी केल्यावर या नदीच्या पात्राला लागूनच नक्षलवाद्यांचे मोठे शिबीर सुरू असल्याचे लक्षात आले. या जवानांच्या हालचाली लक्षात येताच आंघोळ करणाऱ्या सहकाऱ्यांवर नजर ठेवून असलेल्या नक्षलवाद्यांनी लगेच गोळीबार सुरू केला. जवानांनी त्याला प्रत्युत्तर दिले. या चकमकीत नदीच्या पात्रातील सहा नक्षलवादी ठार झाल्याची माहिती आता समोर आली आहे. ठार झालेल्या सहकाऱ्यांचे मृतदेह नक्षलवाद्यांनी ओढत जंगलात नेले होते. नदीच्या पात्राच्या पलीकडला भाग छत्तीसगडच्या बांदे पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने या घटनेची माहिती तातडीने कांकेरच्या पोलीस अधीक्षकांना कळवण्यात आली, मात्र छत्तीसगड पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचू शकले नाही. त्यामुळे सी-६० च्या जवानांना परत यावे लागले. या चकमकीची माहिती देताना गडचिरोली पोलिसांनी एक महिला नक्षलवादी ठार झाली, असे माध्यमांना सांगितले होते. ती नर्मदाच असल्याचे आता चौकशीतून स्पष्ट झाले आहे. यानंतर दुसऱ्या दिवशी छत्तीसगड पोलिसांनी या भागात शोध मोहीम राबवली असता नर्मदा व भास्करच्या मृत्यूची बाब समोर आली.