|| रमेश पाटील रस्ते, पाणीपुरवठा, रोजगार यासंदर्भातील समस्या सोडवण्यास अपयश :- वाडा तालुक्याला तीन आमदार लाभूनही तालुक्यातील रस्ते, पिण्याचे पाणी, रोजगार, दळणवळणाची साधने, आरोग्याचे प्रश्न अशा अनेक समस्या सोडवण्यास तालुक्यातील तीनही आमदारांना यश न आल्याचे दिसून येत आहे. वाडा शहराचा संपूर्ण भाग हा भिवंडी ग्रामीण मतदारसंघात येतो. या मतदारसंघाचे नेतृत्व शिवसेनेचे आमदार शांताराम मोरे करत आहे. वाडा नगरपंचायतीची सत्तादेखील शिवसेनेकडे आहे. असे असतानाही वाडा शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. येथील सर्वच रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात पाण्याने भरलेल्या खड्डय़ातील चिखलातून पादचाऱ्यांना वाट शोधावी लागत आहे. वाडा शहरातील पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न येथील विद्यमान आमदारांना सोडवता आलेला नाही. भर पावसाळ्यातही शहरात अनेक ठिकाणी टँकर, बैलगाडीने पाणीपुरवठा होत असतो. शहरातील अनेक परिसरांत आठवडय़ातील तीन-तीन दिवस पाणीपुरवठा होत नाही. वाडा शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यास लोकप्रतिनिधींना अपयश आल्याचे दिसून येत आहे. वाडा शहरात एकही सार्वजनिक स्वच्छतागृह नाही. वाडा तालुक्याच्या पश्चिम भाग विक्रमगड मतदारसंघात येतो. या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व विद्यमान आमदार विष्णू सवरा यांनी केले आहे. ते साडेचार वर्षे आदिवासी विकास खात्याच्या मंत्रिपदावर असतानाही या मतदारसंघात येणाऱ्या वाडा तालुक्यातील शिरीषपाडा-खानिवली रस्ता, गोऱ्हे- गालतरे रस्त्यांबरोबर इतर अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. या भागातील देवळी, सांगे, नाणे, गुहीर येथील पाणीटंचाई अशा अनेक समस्या सोडवण्यास त्यांना अपयश आले आहे. वाडा तालुक्यातील पूर्व भाग शहापूर विधानसभा मतदारसंघात येतो. या भागाचे प्रतिनिधित्व विद्यमान आमदार पांडुरंग बरोरा हे करतात. त्यांच्या मतदारसंघातील सर्वाधिक रहदारी असलेला वाडा-खर्डी या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. त्याच बरोबर डाढरे, दाभोण, पिंपरोली अशा अनेक गावांना जाणाऱ्या रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. वाडा शहरातील रस्त्यांची दुरवस्था, पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची होत असलेली परवड तसेच शहरात एकही नसलेले सार्वजनिक स्वच्छतागृह अशा अनेक असुविधांचा परिणाम येथील विद्यमान आमदारांच्या मतांवर होण्याची शक्यता आहे. - प्रल्हाद सावंत, सामाजिक कार्यकर्ता, वाडा. वाडा तालुक्याची विभागणी भिवंडी ग्रामीण, विक्रमगड व शहापूर या तीन विधानसभा मतदारसंघांत झालेली आहे. तालुक्यात कुठली जनहितार्थ कामे झालेली नसल्याचे चित्र असून त्याचा निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो. - लोकेश पाटील, सामाजिक कार्यकर्ता, गांध्रे