विधानसभेत झालेल्या बहुमत चाचणीदरम्यान महाविकास आघाडी सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. उद्धव ठाकरे सरकारने अत्यंत सहजपणे बहुमत सिद्ध केलं आहे. १६९ आमदारांनी उद्धव ठाकरे सरकारला समर्थन दिलं. तर चार आमदारांनी यावेळी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. तटस्थ राहणाऱ्या आमदारांमध्ये मनसेचे आमदार राजू पाटीलदेखील होते. राज ठाकरे शपथविधीला हजर राहिल्यामुळे मनसे बहुमत चाचणीदरम्यान काय भूमिका घेईल याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र मनसेने यावेळी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. मनसेसोबत सीपीआयचा एक आणि एमआयएमचे दोन आमदार तटस्थ राहिले. भाजपाने मात्र हे अधिवेशन बेकायदेशीर असल्याचा आरोप करत सभात्याग केला.

शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारात विधानसभेत बहुमत चाचणीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. यावेळी विऱोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काही आक्षेप नोंदवले. यामध्ये हे अधिवेशनच बेकायदा असल्याचे ते म्हणाले. तसेच हंगामी अध्यक्ष बदलल्याबद्दल त्यांनी हे देशात पहिल्यांदाच घडले असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच सभागृहाचे कामकाज नियमांना धरुन होत नसल्याचा आरोप यावेळी फडणवीस यांनी केला. यावेळी भाजपाच्या आमदारांनी प्रचंड गोंधळ घालत ‘दादागिरी नही चलेगी’ अशी घोषणाबाजी केली. त्यानंतर भाजपाच्या आमदारांसह फडणवीस सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकत सभागृहाच्या बाहेर पडले.

दरम्यान, सभागृहात बहुमताची चाचणी पार पडली. यावेळी आवाजी मतदानाने शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसच्या आमदारांनी महाविकास आघाडीच्या सरकारला पाठींबा दर्शवला. त्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार, प्रत्येक समर्थक आमदारांची क्रमांक आणि नावासह प्रत्यक्ष मोजणी करण्यात आली. यामध्ये १६९ आमदारांनी सरकारला पाठिंबा दर्शवला. यावेळी माकप, मनसे आणि एमआयएमच्या मिळून चार आमदारांनी सरकारला पाठींबाही दिला नाही आणि विरोधातही मतदान केले नाही, ते तटस्थ राहिले. मात्र, भाजपाच्या सर्व आमदारांनी बहिष्कार घातल्याने कोणीही सभागृहात विऱोधात मतदान केले नाही.