सह्याद्रीप्रमाणे ताठ कणा ठेवून उभा राहिलेला महाराष्ट्र मला बघायचा आहे. मात्र, मला तसं दिसत नाही. ज्या महाराष्ट्राने अटकेपार झेंडे फडवले तो महाराष्ट्र आज हतबल झाल्याचा दिसत आहे. त्यामुळे ही कणखर मनगटं कुठं लपली? हा प्रश्न सह्याद्रीला पडला असावा, असे म्हणत राज ठाकरे यांनी नाशिक येथील सभेची सुरूवात केली. यावेळी त्यांनी  बेरोजगारीच्या मुद्यांवरून टीका करत, केंद्र सरकारने सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रात केवळ पाच वर्षात पाच लाख उद्योगधंदे बंद पडल्याचे सांगितले. तसेच, ‘एचएएल’ कंपनी दुसऱ्यांच्या घशात घालण्याचे सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचाही आरोप केला.  कलम ३७० हटवण्याचा महाराष्ट्रातील प्रश्नांशी काय संबंध? असेही त्यांनी विचारले.

यावेळी राज यांनी सरकारचा समाचार घेत म्हटले की,  भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कामगार देशोधडीला लागला आहे. देशाचे संरक्षण करण्यासाठी जिथं विमानं बनवतात तिथल्या कामगारांनाच पगार मिळत नाही. ‘एचएएल’ कुणाच्या तरी घशात घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. राफेल सारखी विमानं बाहेरून आणली जातात आणि त्याची कामं अनिल अंबानी सारख्यांना दिली जातात. भलत्याच गोष्टीकडे तुमचं लक्ष वळवल्या जात आहे. पाच वर्षात काय केल? हे सरकार सांगत नाही. कारण, त्यांना माहिती आहे, भावनेच्या आधारावर मतदान होईल. गृहमंत्र्यांकडून केवळ कलम ३७० हटवले एवढंच सांगितलं जात आहे. कलम ३७० हटवण्यात आल्याशी महाराष्ट्रातील प्रश्नांशी काय संबंध आहे? काश्मीरमध्ये काय करत आहात हे सांगा, कलम हटवल्याबद्दल अभिनंद मात्र महाराष्ट्रातील प्रश्नांवर कोण बोलणार? येथील शहरं बकाल होत आहेत, महाराष्ट्रासह देशभरातील उद्योगधंदे बंद होत आहेत.  आज सर्व मोठ्या कंपन्या कामगार कपात करत आहेत. केंद्र सरकारने सांगितल्याप्रमाणे पाच वर्षात पाच लाख उद्योग केवळ महाराष्ट्रात बंद झाले. तुमच्यावर अन्याय होत असूनही तुम्ही रोष व्यक्त करत नाहीत.

नोटाबंदीचा निर्णय चुकला, तर देश खड्ड्यात गेला असे समजा, हे मी तेव्हाच सांगितले होते. या चुकीच्या निर्णयामुळे लाखोंच्या नोकऱ्या जातील हे देखील मी म्हणालो होतो. त्यानंतर नोटाबंदीमुळे अनेकांना प्राण गमवावे लागले. मोदी म्हणाले होते की ५० दिवसांत देश बदलून दाखवेन, आज मोदींना सत्ते येऊन किती दिवस झाले? असा सवाल राज यांनी केला. तसेच, नोबेल विजेते अभिजीत बॅनर्जी यांनी देखील भारताची आर्थिक स्थिती चांगली नसल्याचे सांगितले आहे, आज महाराष्ट्रातील बँका देखील बंद पडत आहेत. पीएमसी बँकेचे खातेदार आज पैसे काढता येत नाही म्हणून रडत आहेत. दोन दिवसातच दोन ठेवीदारांचा मृत्यू झाला आहे, असेही राज यांनी यावेळी सांगितले.

शिवसेना-भाजपा ताटवाट्या घेऊन फिरत आहेत. एक म्हणतो दहा रुपाय जेवण देणार, तर दुसरा म्हणतो पाच रुपयात देणार, जणू काही महाराष्ट्र भिकेला लागला आहे. असे म्हणत त्यांनी शिवसेना भाजपाचा समाचार घेतला. तसेच, उद्धव ठाकरे यांच्या भाजपाबरोबर न जाण्याबाबत केलेल्या भाषणाचा दाखला देत, आता भाजपाबरोबर केलेल्या युतीबद्दलही टीका केली.