महाराष्ट्रामधील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला असून उद्या म्हणजेच २७ नोव्हेंबर रोजी बहुमत चाचणी घेण्याचा आदेश दिला आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले आहेत. हा निकाल योगायोगानं संविधान दिवस साजरा होत असताना आल्यानं भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान झाला असल्याची प्रतिक्रिया शरद पवारांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

“राज्यघटनेतील तत्वे आणि लोकशाही मूल्यांची जपणूक केल्याबद्दल सन्मानीय सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून आभार! हा निकाल योगायोगानं संविधान दिवस साजरा होत असताना आल्यानं भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान झाला, याचा आनंद आहे,” असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रामधील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. राज्यामधील घोडेबाजार थांबवण्यासाठी लवकरात लवकर बहुमत चाचणी घेणे गरजेचे असल्याचे सांगत न्यायलयाने उद्या म्हणजेच २७ नोव्हेंबर रोजी बहुमत चाचणी घेण्याचा आदेश दिला आहे. उद्या पाच वाजेपर्यंत आमदारांचा शपथविधी पूर्ण करण्यात यावा असंही न्यायालयाने आदेशात म्हटलं आहे. विश्वासदर्शक ठरावाचे लाईव्ह चित्रीकरण करण्यात यावं असंही न्यायालयाने सांगितलं आहे.

“लोकशाही मूल्यांचं रक्षण होणं आवश्यक आहे. लोकांना चांगलं सरकार मिळणं हा मुलभूत अधिकार आहे. तसंच घोडेबाजार रोखण्यासाठी न्यायालयाला काही आदेश देणं गरजेचं आहे. त्यामुळे कोणतेही गुप्त मतदान न घेता उद्या (२७ नोव्हेंबर) सायंकाळी पाच वाजेपर्यंत बहुमत चाचणी घेण्याचा आदेश आम्ही देत आहोत,” असं न्यायाधिशांनी स्पष्ट केलं.

बहुमतासाठी घेण्यात येणारे मतदान हे गुप्त पद्धतीने न घेता ते थेट घेण्यात यावे तसेच या मतदानाचे लाइव्ह टेलिकास्ट करण्यात यावे असंही न्यायलयाने स्पष्ट केलं आहे. संबंधित निकाल देताना न्यायलयाने बहुमत चाचणीसाठी हंगामी व स्थायी अध्यक्षांची नेमणूक करून आमदारांना शपथ देण्याचे आदेश दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातील महत्त्वाचे मुद्दे
– २७ नोव्हेंबरला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करा
– शपथविधी झाल्यानंतर लगेचच बहुमत सिद्ध करण्यात यावं
– गुप्त मतदान नको
– विश्वासदर्शक ठरावाचे लाईव्ह चित्रीकरण करा
– बहुमत चाचणीसाठी प्रोटेम स्पीकर म्हणजेच हंगामी अध्यक्षांची नियुक्ती करा
– हंगामी अध्यक्षच बहुमत चाचणी घेणार