राज्यातील सत्तास्थापनेचा पेच अद्यापही कायम असून शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मदतीने सत्तास्थापन करणार हे जवळपास स्पष्ट झालं आहे. राज्यात महाविकासआघाडीचं सरकार आलं तर यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची मुख्य भूमिका असेल. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी संपर्क साधत दोन्ही बाजू सांभाळण्याची जबाबदारी शरद पवार यांनी अत्यंत हुशारीने पार पाडली आहे. मात्र शपथविधी होत नाही तोपर्यंत शरद पवारांवर विश्वास नाही असं वक्तव्य प्रहार जनशक्तीचे एकमेव आमदार बच्चू कडू यांनी केलं आहे. बच्चू कडू यांनी शिवेसनेला आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे. मातोश्रीवर जाऊन त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेटदेखील घेतली होती.

बच्चू कडू यांनी शपथविधी होत नाही तोपर्यंत पवार काय करतील सांगू शकत नाही असं सांगत भीती व्यक्त केली आहे. तसंच शरद पवार काय करतील हे अजित पवारांना नाही कळलं तर मला काय कळणार असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला. पुढे बोलताना त्यांनी माझी राष्ट्रवादीसोबत जाण्याची इच्छा नव्हती असंही स्पष्ट केलं.

आणखी वाचा- “मोठ्या शत्रूला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी छोट्या शत्रूला जवळ केलं”

“भाजपा आणि शिवसेनेची युती होईल असं वाटलं होतं त्यामुळेच त्यांना पाठिंबा दिला होता. राष्ट्रवादीसोबत जाण्याची आमची मानसिकता नव्हती. पण हा बदल आता स्विकारला पाहिजे. राजकारणात काहीही होऊ शकतं. पण जे काही होत आहे ते महाराष्ट्राच्या भल्यासाठी होत आहे,” असं बच्चू कडू यांनी सांगितलं आहे. तसंच आपण मी उद्धव ठाकरेंना शब्द दिला होता, त्यामुळे दगाफटका करणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं.

बच्चू कडू यांना उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं का असं विचारलं असता त्यांनी, “कोण मुख्यमंत्री होणार यापेक्षा कोणासाठी होणार हे महत्त्वाचं आहे. राज्यात अनेक महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित असून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तर त्यांच्याकडून खूप अपेक्षा असतील,” असं सांगितलं.