एकीकडे विधानसभेचे चुरस सुरु असतानाच साताऱ्यामध्ये लोकसभेच्या पोट निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीने भाजपाला जोरदार झटका दिला आहे. लोकसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपाच्या उदयनराजे भोसलेंचा पराभव झाला आहे. ९५ हजारहून अधिक मतांनी राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील विजयी झाले आहेत. उदयनराजेंच्या पराभावाबद्दल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी या प्रश्नावर थेट उत्तर देणे टाळले. शिवसेना-भाजपा युती बहुमताचा आकडा गाठणार असले तरी महाआघाडीनेही अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. राष्ट्रवादी ५५ जागांवर आघाडीवर असून काँग्रेस ५४ जागी आघाडीवर आहे. त्यामुळे महायुतीच्या आघाडीमध्ये शतकी मजल मारल्याचे चित्र दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. यामध्ये सुळेही सहभागी झाल्या. यावेळेस प्रसारमाध्यमांशी बोलताना सुळे यांना उद्यनराजेंच्या पराभवाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी 'श्रीनिवास पाटील यांचा बुलंद आवाज दिल्लीमध्ये घुमेल एवढचं मी सांगेन,' अशी प्रतिक्रिया दिली. तसेच 'आमच्या पक्ष दडपशाही करणारा नसून येथे सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे. मी इतकचं सांगेन की हा राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांचा विजय आहे. सर्व कार्यकर्त्यांनी केलेल्या कठोर परिश्रमामुळेच हे यश मिळाले आहे.' असंही मत त्यांनी व्यक्त केलं. पाटील यांच्या विजयावर पवार म्हणतात.. श्रीनिवास पाटील यांच्या विजयाबद्दल शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना आनंद व्यक्त केला. “साताऱ्याच्या गादीची प्रतिष्ठा न राखणाऱ्यांचा पराभव झाला आहे. कोणी चुकीच्या मार्गाने जात असेल तर त्याचं समर्थन केलं नाही हे लोकांनी दाखवून दिलं आहे. सत्ता जाते, सत्ता येते मात्र पाय जमिनीवरच ठेवावे लागतात. सत्तेचा उन्माद जनतेला आवडत नाही हे या निकालातून स्पष्ट झालं आहे. श्रीनिवास पाटील हे एकेकाळचे संसदेचे सदस्य होते. एका राज्याचं राज्यपाल पद त्यांनी सांभाळलं म्हणूनच आम्ही त्यांना उमेदवारी दिली. सातारच्या जनतेने चांगल्या मतांनी त्यांना निवडून दिलं त्याबद्दल सातारकरांचा आभारी आहे,” असं मत पवारांनी नोंदवलं. तसेच आपण साताऱ्याला जाऊन आपण जनतेचे आभार मानणार आहोत असंही त्यांनी सांगितलं. पाटील म्हणाले, "उदयनराजेंचा हा पराभव म्हणजे." राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील उदयनराजे भोसलेंचा पराभव केल्यानंतर पहिली प्रतिक्रिया व्यक्त करताना शरद पवारांना दगा दिल्यानेच उदयनराजेंचा पराभव झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. “ही निवडणूक लोकांनीच हातात घेतली होती. मला पहिल्या दिवसापासून पाठिंबा मिळत होता. त्यामुळे विश्वास वाढला होता. पवारांनी पावसात भिजत केलेल्या भाषणामुळे पवार, राष्ट्रवादीसंबंधी सहानुभूतीची एक लाट निर्माण झाली होती,” असं मत पाटील यांनी व्यक्त केले.