शरद पवार यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिकला काय बोलले त्याने काही फरक पडत नाही. ते काहीही बोलू शकतात, कारण नागपूरचे त्यांच्यावरच संस्कारच हे आहेत. हे फडणवीस काय? नाना फडणवीस काय, कुठलेही फडणवीस काय बोलणार हे सांगण्याची गरज नाही. मात्र पंतप्रधान जे काही बोलले ते त्यांनी बोलायला नको होतं" असं म्हणत शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. राज्याचे मुख्यमंत्री @Dev_Fadnavis नाशिकला काय बोलले त्याने फरक पडत नाही. कारण ते काहीही बोलू शकतात. कारण नागपूरचे त्यांच्यावर संस्कारच हे आहेत. त्यामुळे हे फडणवीस काय आणि नाना फडणवीस काय, कुठलेही फडणवीस काय बोलणार हे सांगायची गरज नाही. पण पंतप्रधानांनी असे बोलण्याची गरज नव्हती. pic.twitter.com/a5BLEr1DmK — Sharad Pawar (@PawarSpeaks) September 20, 2019 "विकासाचा प्रश्न येतो तेव्हा कुणाचा हात धरुन जावं असा प्रश्न पुढे येतो, त्यावेळी शरद पवार हेच नाव माझ्यासमोर येतं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. कधी म्हणता माझी करंगळी धरुन चालता, मग निवडणूक जवळ आली की असं का बोलता? हे वागणं योग्य नाही" असंही शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुनावलं आहे. " पंतप्रधान काहीही बोलण्याइतके कर्तृत्त्ववान आहेत. मलाही बोलता येतं पण मी बोलणार नाही. त्याचं कारण पंतप्रधान ही एक संस्था आहे. हे पद लोकशाहीतील महत्त्वाचं पद आहे. या पदाची अप्रतिष्ठा मला होऊ द्यायची नाही म्हणून मी शांत आहे " असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं. " महाराष्ट्राने मला भरभरुन दिलं आहे. माझी आता कोणतीही इच्छा नाही. जनतेने मला चारवेळा मुख्यमंत्री केलं. देशाचा संरक्षण मंत्री केलं. 10 वर्षे कृषीमंत्री केलं. जनतेने मला भरभरुन दिलं. आता आणखी काहीही नको. अखेरच्या श्वासापर्यंत अवघ्या महाराष्ट्रासाठी काम करणे हीच माझी इच्छा आहे " असंही शरद पवार यांनी बोलून दाखवलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात ते बोलत होते. " पाकिस्तानचे सत्ताधारी पंतप्रधान, राष्ट्रपती, सैन्याधिकारी सगळेच पाकिस्तानच्या जनतेची फसवणूक करतात, हे मी बोललो मात्र मोदींनी काय सांगितलं की मी पाकिस्तानची स्तुती केली. ही काय पाकिस्तानची स्तुती आहे का? " असाही प्रश्न शरद पवार यांनी विचारला.