निवडणुकीचे निकाल लागून आता आठवड्यापेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. त्यातच सत्तावाटप आणि मुख्यमंत्रिपदाचा तिढाही अद्याप सुटलेला नाही. त्यातच मुख्यमंत्रिपद आणि सत्तावाटपाच्या फॉर्म्युलावरून शिवसेना आणि भाजपमामध्ये अद्यापही एकमत झालेलं नाही. अशातच शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. शिवसेनेला संपवण्याचा भाजपाचा डाव असल्याचा आरोप सत्तार यांनी केला.

“शिवसेनेला समाजसेवा हवी आहे. शिवसेनेत समाजसेवा जास्त आणि राजकारणाला कमी महत्त्व आहे. परंतु भाजपाला सत्ता हवी आहे. भाजपाकडून दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तसंच सत्तावाटपासंदर्भात चर्चा न होण्याची अनेक कारणं आहेत. भाजपाचा शिवसेनेला संपवण्याचा डाव आहे,” असं सत्तार यावेळी म्हणाले. एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना त्यांनी हा आरोप केला. “केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी युतीदरम्यान जे काही सांगितलं तसं ते वागले नाहीत. म्हणून आज अशी परिस्थिती उद्भवत आहे. मोठ्या भावाला छोटं करण्याचं षड्यंत्र रचलं जात असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ते ओळखलं आहे,” असं सत्तार म्हणाले.

आणखी वाचा- काँग्रेसने शिवसेनेसोबत मुळीच जाऊ नये : सुशीलकुमार शिंदे

“भाजपाला राज्यातील शेतकऱ्यांची स्थिती दिसत नाही. त्यांना केवळ खुर्चीची चिंता आहे. युतीमध्ये केवळ आपलं मत मांडून चालत नाही. राष्ट्रपती राजवटीबाबत सुधीर मुनगंटीवार यांनी केलंलं वक्तव्य हे केवळ शिवसेनेवर दबाव निर्माण करण्यासाठी केलेलं आहे. ७ नोव्हेंबरपर्यंत राज्यात नक्कीच सरकार स्थापन होईल, असंही ते म्हणाले. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची आम्ही वेळच येऊ देणार नाही. आम्ही चर्चा करण्यासाठी तयार आहोत. फक्त आम्हाला देण्यात येणारी आश्वासनं लेखी स्वरूपात हवी आहेत. उद्या जर भाजपा म्हणालं आम्ही असं बोललोच नाही, तर अशावेळी आम्ही काय करायचं? असा सवालदेखील त्यांनी यावेळी केला. युतीमध्ये सन्मानानं वागवणं आवश्यक आहे. उद्धव ठाकरे यांनी सर्व गोष्टींची जाण आहे. त्यांना सर्व अधिकार देण्यात आले आहेत. ते योग्य वेळी योग्य तो निर्णय घेतील, असंही सत्तार यांनी स्पष्ट केलं.

आणखी वाचा- ठरवलं तर शिवसेना बहुमत सिद्ध करु शकते : संजय राऊत

ठरल्याप्रमाणे सत्ता वाटप – दानवे
आम्ही युतीत अनेक निवडणुका लढलो. त्यावेळी जो फॉर्म्युला ठरला त्याप्रमाणे निवडणुकीत सहभाग घेतला. काही अपवाद सोडले तर शिवसेना आणि भाजपाने युतीतच निवडणुका लढवल्या आहेत. ठरलेल्या फॉर्म्युला प्रमाणेच लोकसभेत आणि विधानसभेत शिवसेना भाजपाची युती झाली. युतीच्या चर्चेदरम्यान जे ठरलं असेल त्याप्रमाणेच मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात येईल. युतीचे नेते काय म्हणतात हे महत्त्वाचं असल्याची प्रतिक्रिया खासदार रावसाहेब दानवे-पाटील यांनी दिली.