आगामी विधानसभा निवडणुकीसाठी लवकरच भाजपा आणि शिवेसना युतीची घोषणा होण्याची शक्यता असल्याची सुत्रांची माहिती आहे. २२ सप्टेंबरला केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाध्यक्ष अमित शाह मुंबईत असून यावेळी युतीची घोषणा केली जाऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान शिवसेना-भाजपामध्ये १२६-१६२ जागांचा फॉर्म्युला ठरला असल्याचंही सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. शिवसेना १२६ जागांवर लढणार असून, भाजपा आणि मित्रपक्षांसाठी १६२ जागा सोडण्याची तयारी दर्शवली आहे.

शिवसेना भवनवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीसंबंधी चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली असून शिवेसनेचे सचिव अनिल देसाई यांनी १०० टक्के युती होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. यावेळी बोलताना अनिल देसाई यांनी निवडणुकीच्या तयारीचा पूर्वभाग म्हणून बैठक बोलावण्यात आली असल्याचं सांगितलं. यावेळी अनिल देसाई यांनी समाधानी असल्याशिवाय पुढे जाणार नाही असंही स्पष्ट केलं आहे.

“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्यात चर्चा होऊन युतीचा निर्णय घेतला जाईल. सध्या किती जागा लढणार आहोत यासंबंधी आपण सांगू शकत नाही. सध्या अंतिम चर्चा सुरु आहे. चर्चा सकारात्मक सुरु असून युती होईल. पण समाधानी असल्याशिवाय पुढे जाणार नाही,” असं अनिल देसाई यांनी स्पष्ट केलं आहे. रविवारी अमित शाह यांच्या मुबंई दौऱ्यात किंवा त्याअगोदर युतीची घोषणा होईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे.