काँग्रेस, राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष विचारधारेपासून दूर गेले आणि दुटप्पी भूमिका घेत असल्याने, त्या पक्षातील अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केला असे केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी मधील जे नेते भाजपात आले आहेत, ते सर्व चांगले असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधील अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप भाजपकडून करण्यात आले आहेत. पण आज ते सर्व नेते भाजप मध्ये आले आहेत. या प्रश्नावर जावडेकर यांनी भूमिका मांडली. यावेळी प्रकाश जावडेकर म्हणाले की, काँग्रेस आणि आमच्यात दोन गोष्टींचा फरक आहे. एक म्हणजे आम्ही कोणत्याही निवडणुकीत विजयी झाल्यावर योजना जोरदारपणे राबवितो, आमचा पक्ष २४ तास काम करणारा आहे. परंतु काँग्रेस पक्ष निवडणूक किंवा त्यानंतर त्यांचा काही कार्यक्रम दिसत नाही. आता तर काँग्रेसच्या अध्यक्षाचा पत्ता नाही. तसेच घराणेशाही, भ्रष्टाचार, वोट बँक पॉलिटिकस आणि वैचारिक दिवाळखोरी यामुळे जनतेच्या मनातून काँग्रेस उतरली असून पक्षाच्या दुटप्पी भूमिकेमुळे नेते देखील दूर होत असल्याचे सांगत काँग्रेसवर त्यांनी निशाणा साधला. तसेच ते पुढे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता केवळ पाश्चिम महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महायुती २२१ जागांवर निश्चित विजयी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आरे येथील वृक्ष तोडीबाबत मला माहितीच नाही : प्रकाश जावडेकर मुंबईतील आरे परिसरात मेट्रो कार शेड उभारण्यासाठी अनेक झाडांची कत्तल करण्यात आली. या बाबत पर्यावरण मंत्री म्हणून प्रकाश जावडेकर यांना विचारले असता ते म्हणाले की, आरे बाबत मला माहिती नसून बीएमसी मधील कोणीतरी कापली असतील. मात्र एक झाड कापले गेले असेल, तर एका झाडाच्या बदल्यात पाच झाडे लावावी लागतील, आपल्या देशाची संस्कृती पर्यावरणपूरक अशी आहे. त्यामुळे एका झाडाच्या बदल्यात पाच झाडे लावावी. ती जगली का नाही याची दरवर्षी सॅटेलाइटच्या आधारे मोजणी केली जाईल असे त्यांनी सांगितले.