काँग्रेस पक्ष आता महाराष्ट्रात उरलाच नाही, ना शेंडा ना बुडखा अशी काँग्रेसची अवस्था आहे. राष्ट्रवादी काँग्रेसही संपत आली आहे असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. महायुतीच्या सभेत ते मुंबईत बोलत होते. काँग्रेसचा विचार गेला आणि विकार आला त्यामुळे तो पक्ष महाराष्ट्रात उरला नाही.

याआधी सभा झाली तेव्हाही असाच जनसागर होता. तेव्हा लोकसभेच्या निवडणुकीचं निमित्त होतं. देवेंद्र फडणवीस यांनी आत्ता विधानसभेसाठी आशीर्वाद मागितले. लोकसभेच्यावेळीही आशीर्वाद मागितले होते. आता महाराष्ट्रात भगवं वातावरण दिसतं आहे. समोर दुसरं कुणी आहे की नाही तेच कळत नाही असा टोला शिवसेना उद्धव ठाकरे यानी लगावला. महायुतीच्या सभेत उद्धव ठाकरे बोलत होते.

काँग्रेस पक्ष थकला आहे अशी कबुली सुशीलकुमार शिंदे यांनी दिली. बरोबर आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष खाऊन खाऊन थकले आहेत. काँग्रेसमध्ये एक काळ असा होता की नेत्यांची नावं घेतली की आदराने मान खाली जायची आता काँग्रेसवाल्यांमुळे शरमेने मान खाली जाते. निवडणुकीला काँग्रेसच्या नेत्यांनी व्यवसायांचं स्वरुप दिलं. आमच्यासमोर आता कुणी विरोधक उरलेला नाही त्यामुळे आव्हान मोठं आहे. सध्या महाराष्ट्रात मजबूत आणि काम करणारं सरकार देऊ शकते हे महायुतीने गेल्या पाच वर्षात सिद्ध केलं आहे असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

भाजपाच्या जाहीरनाम्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याची शिफारस करण्यात आली आहे. ही बाब मला फार आवडली असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. लोकसभेत भगवा फडकवला आहे तोच भगवा आता विधानसभेवरही फडकवू हे लोकांनी ठरवलं आहे कारण लोकांनी ही निवडणूक हाती घेतली आहे असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.